
विदर्भात वाळू माफियांचा मुद्दा ऐरणीवर असतांना गोंदिया जिल्ह्यात अवैधरीत्या वाळू तस्करी करणाऱ्या अवैध वाहनांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
गोंदियात वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली होती, आणि त्यानंतरच्या काही दिवसांतच विदर्भातील अनेक भागांतून वाळू तस्करीच्या घटना उघडकीस येत आहेत. अमरावती, भंडारा-गोंदिया, रामटेक, नागपूर आणि तुमसर या भागांतून मिळालेल्या अहवालांमधून हे स्पष्ट झाले आहे की वाळू तस्करीचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आता अवैधरित्या गोंदिया जिल्ह्यात वाळूची वाहतूक करण्याची मोठी घटना समोर आली आहे.
प्रशासनाने यावर गोंदिया मोठी कारवाई केली आहे. गोंदिया शहरातील चौरगाडे चौकात सहा टिप्पर वाहनांना जप्त करण्यात आले आहे. ही वाहने कोणतीही अधिकृत कागदपत्रे न देता वाळूची वाहतूक करत होती. जिल्हा प्रशासनाने हे सर्व टिप्पर ताब्यात घेतले आहेत. त्यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे. विदर्भात मागील काही आठवड्यांपासून वाळू तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवैधरित्या वाळू उत्खनन आणि वाहतुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

मुख्यमंत्र्यांचे आदेश
अनेक वाळू साठ्यांमधून मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यामुळे सामान्य जनतेला कायदेशीररित्या वाळू मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. या वाढत्या तक्रारींना अनुसरून माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या विषयाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली होती. डॉ. परिणय फुके यांच्या मागणीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर गोंदियातील ही धडक कारवाई झाल्याचे समजते.
वाळू तस्करी प्रकरणात दोषी आढळलेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. संबंधित आदेश लवकरच जाहीर होणार असल्याने प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई म्हणजे केवळ तात्कालिक उपाय नसून, वाळू वाटप प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठीचा एक ठोस प्रयत्न आहे. विशेषतः घरकुल लाभार्थ्यांना कायदेशीर मार्गाने वाळू मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र प्रशासनाच्या या कृतीमुळे गरिबांना आता थोडाफार दिलासा मिळताना दिसतो आहे.
Vijay Wadettiwar : शिक्षणातही खोटेपणाचा अंधार, संतप्त झाले वडेट्टीवार
जनतेत दिलासा
वाळू माफियांकडून होणाऱ्या त्रासाला प्रतिबंध लागण्याची शक्यता असल्याने सामान्य नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. प्रशासनाने वाळू तस्करीच्या साखळीवर थेट हात घातल्यामुळे या अवैध उद्योगावर लगाम बसत आहे. आकस्मिक कारवायांमुळे वाळू डेपोमध्ये नव्याने शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण होत आहे. या मोहीमेचा अंतिम हेतू म्हणजे गरजूंना त्यांच्या कायदेशीर हक्काची वाळू योग्य पद्धतीने मिळवून देणे आणि तस्करांच्या विळख्यातून या यंत्रणेला मुक्त करणे. आता पाहायचं इतकंच की या कारवायांचा दीर्घकालीन प्रभाव किती परिणामकारक ठरतो.