
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे भवितव्य अंधारात हरवत आहे, आणि शिक्षणाच्या मंदिरांत आता विद्यार्थ्यांची पावलेच वळेनाशी झाली आहेत. दोन वर्षांत 20 हजारांहून अधिक विद्यार्थी गमावलेली ही शैक्षणिक यंत्रणा आज ढासळलेल्या व्यवस्थेचे भेदक प्रतीक ठरते आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठास संलग्न महाविद्यालयांची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे. मागील दोन वर्षांत तब्बल 20 हजार विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे उच्च शिक्षणाच्या पायाभूत रचनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरी, ग्रामीण तसेच आदिवासी भागात असलेली ही महाविद्यालये आज विद्यार्थ्यांविना ओस पडू लागली आहेत.
महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची उपस्थिती दहा टक्क्यांहूनही कमी असल्याची माहिती खुद्द प्राचार्यांनी दिली आहे. केवळ नावापुरते सुरू असलेले हे शिक्षण संस्थान आज शैक्षणिक आणि प्रशासनिक बेपर्वाईचे प्रतीक बनत चालले आहे. राज्य शासन आणि विद्यापीठ प्रशासन यांची ढिसाळ धोरणे, अंमलबजावणीतील कमतरता आणि गुणवत्तेचा अभाव यामुळे गोंडवाना विद्यापीठाची पत झपाट्याने घसरत आहे.

Congress : गोंदियात नानांचा ‘हात’ गेला निसटून, ‘कमळ’ आलं फुलून
भकास वास्तव
गोंडवाना विद्यापीठाची स्थापना आदिवासी व ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी करण्यात आली होती. मात्र आज हीच व्यवस्था विद्यार्थ्यांच्या गळतीमुळे उध्वस्त होत आहे. सत्र पद्धतीचे नियोजन, शिक्षणाचे केंद्रीकरण, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अर्धवट अंमलबजावणी, यामुळे विद्यार्थी भ्रमित झाले आहेत. अभ्यासक्रम जरी वाढले असले तरी त्याचा उपयोग नाही, असे विद्यमान चित्र आहे.
विद्यार्थी वर्गात कमी आणि कँटीन, परिसरात अधिक, अशी स्थिती आज नेहमीची झाली आहे. महाविद्यालयात बीए, बीकॉम, बीएससी, एमबीए, एलएलबी, जनसंवाद, फॅशन डिझाईनसारखे कोर्स सुरू असले तरी वर्गखोल्या रिकाम्या आहेत. ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची संख्या एवढी नगण्य आहे की, काही ठिकाणी ते केवळ हजेरीपटावरच अस्तित्वात आहेत.
गुणवत्ता हरवली
विद्यापीठाने परीक्षेसाठी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य केली असली तरी ती दाखवताना प्राचार्यांची तारांबळ उडत आहे. प्रत्यक्षात उपस्थित नसलेले विद्यार्थी, रजिस्टरवर दाखवले जातात, असा आरोप अनेक प्राचार्यांनी नाव न घेता केला आहे. यामागे विद्यापीठाचा दबाव आणि शिक्षकांमधील असहायता स्पष्टपणे दिसते.
विद्यार्थ्यांची अनुपस्थिती, शिक्षणाचा दर्जा, प्रयोगात्मक शिक्षणाचा अभाव, यांकडे कोणाचेच लक्ष नाही.गुणवत्तेच्या बाबतीत प्रशासन पूर्णतः अपयशी ठरत आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या अधीनस्त महाविद्यालयांची स्थिती ही एक शिक्षण व्यवस्थेतील आपत्ती म्हणून पाहायला हवी. आदिवासी भागाच्या शैक्षणिक सक्षमीकरणाचे स्वप्न आज पायदळी तुडवलं जात आहे. ही परिस्थिती थांबवण्यासाठी केवळ धोरणांची नव्हे, तर इच्छाशक्तीचीही गरज आहे. अन्यथा, ही महाविद्यालये लवकरच इतिहासजमा होतील.