महाराष्ट्र

लवकरच बदलणार Washim जिल्ह्याचा पालकमंत्री

मुख्यमंत्री Devendra Fadnavis घेणार निर्णय

Share:

Author

महायुती सरकार मधील काही पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री देखील बदलले जाणार आहेत. 

मंत्रिमंडळातील खाते वाटपानंतर महायुती सरकारमध्ये अद्यापही नाराजी नाट्य सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर महायुतीमध्ये नाराजीचे प्रमाण आणखी वाढले आहे. काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री निवडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. याशिवाय काही जिल्ह्यातील पालकमंत्री आता बदलले जाणार आहे. यामध्ये विदर्भातील वाशिम जिल्ह्याचा देखील समावेश आहे.

वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आहेत. मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्यानंतर बंजारा समाजामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामधून बंजारा समाजाचे दोन मोठे नेते मंत्रिमंडळामध्ये आहेत. शिवसेनेचे संजय राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक यांचा यात समावेश आहे. संजय राठोड यांना यवतमाळ जिल्ह्याची पालकमंत्री पद देण्यात आले आहे. मात्र वाशिम जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास Eknath Shinde नव्हते तयार 

बंजारा मतांचा प्रभाव 

यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर या भागामध्ये बंजारा मतांची संख्या मोठी आहे. त्यातल्या त्यात यवतमाळ जिल्ह्यापेक्षा वाशिम जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाची संख्या सगळ्यात जास्त आहे. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवीचा समावेश वाशिम जिल्ह्यात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा घेतला होता. त्यानंतर पोहरादेवी येथे मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते.

अलीकडेच निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पोहरादेवीचा दौरा केला होता. त्यामुळे वाशिम जिल्ह्याला बंजारा समाजातील संजय राठोड किंवा इंद्रनील नाईक यापैकी कोणी एक पालकमंत्री मिळेल, असे वाटत होते. मात्र पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर बंजारा समाजाची निराशा झाली. संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ जिल्हा दिल्यानंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना कदाचित वाशिम जिल्ह्याची जबाबदारी दिली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्का तंत्राचा वापर करत हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिमची जबाबदारी दिली.

राठोड किंवा नाईक यांच्यापैकी कोणीही पालकमंत्री झाला नाही. इतकेच नव्हे तर बंजारा समाजातील कोणाकडेही वाशिम ची जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे बंजारा समाजामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लवकरच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये फटका बसू नये म्हणून महायुती लवकरच वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री बदलेल, असे दिसत आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेत कदाचित संजय राठोड किंवा इंद्रनील नाईक यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे लवकरच पालकमंत्र्यांच्या यादीत बदल होईल, असे सांगण्यात येत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!