
पश्चिम विदर्भातील वाहतूक सुविधांना आणखी बळकट आणि विकसित करण्यासाठी मूर्तिजापुरचे भाजप आमदार पुढे सरसावले आहेत.
विदर्भ हा नाव घेताच डोळ्यांसमोर येतो तो रखरखाट, रखडलेला विकास, आणि असंख्य वर्षं दुर्लक्षित राहिलेली माणसं. पाणी नाही, वीज नाही आणि रस्ते तर विचारायलाच नको. विशेषतः विदर्भातील पश्चिम भागात परिस्थिती अधिकच गंभीर आहे. अनेक गावांमध्ये महिन्यानंतरही वीज परतत नाही. लोकांना अजूनही मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो.पण या अंधारातून आशेचा एक नवा किरण झळकू लागला आहे.मूर्तिजापुरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी या मागास भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कंबर कसली आहे. पिंपळे यांनी केवळ आश्वासने न देता कृतीतून बदल घडवण्याचा निर्धार केला आहे.
विकासाचा पहिला पहिला टप्पा म्हणजे वाहतुकीची सुविधा सुधारण्याचा निर्णय.26 फेब्रुवारी 2025 रोजी आमदार हरीश पिंपळे यांनी परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांची भेट घेऊन मूर्तिजापुर आगारासाठी 20 नव्या बसेसची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 5 नवीन अशोक लेलँड कंपनीच्या बसेस आगारात दाखल झाल्या आहेत. उर्वरित 15 बसेसही लवकरच ताफ्यात दाखल होणार असल्याचे संकेत आहेत. या नव्या बससेवेचा सर्वाधिक फायदा होणार आहे तो ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना. अकोला व अमरावतीसारख्या शहरी केंद्रांमध्ये उपचारासाठी, कामासाठी किंवा शैक्षणिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता अधिक सोयिस्कर सेवा उपलब्ध होणार आहे.

सेवेसाठी भावनिक हाक
विशेषतः विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करताना या बससेवेचा मोठा आधार मिळणार आहे.हरीश पिंपळेंच्या पुढाकारामुळे केवळ वाहतुकीतच सुधारणा होणार नाही, तर एकूणच पायाभूत विकासाच्या हालचालींना गती मिळण्याची शक्यता आहे. रस्ते, वीजपुरवठा आणि दळणवळण या सर्व गोष्टी विदर्भातील मागास भागात खूपच मागे आहेत. परंतु या बसेसच्या माध्यमातून एक ‘सुलभ व संपर्कयुक्त विदर्भ’ घडवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अमरावती, अकोला आणि मूर्तिजापुर या महत्त्वाच्या केंद्रांमध्ये बससेवा वाढल्याने आरोग्यसेवा, शिक्षण व रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
हे केवळ बसेस नाहीत, तर त्या आशेच्या गाड्या आहेत ज्या विदर्भाला दैनंदिन संघर्षातून बाहेर काढू शकतात.भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी या उपक्रमाला एक सामाजिक बांधिलकी मानत, ही सेवा तुमच्या सुविधेसाठी, तुमच्या भविष्यासाठी अशी भावनिक हाक दिली आहे. केवळ राजकीय पुढाकार न घेता त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या उपक्रमामुळे मुर्तिजापूर आणि आसपासचा भाग नुसता गतिमान होत नाही, तर संधींचा एक नवा अध्यायही उघडतो आहे. ही केवळ सुरुवात आहे, असा विश्वास पिंपळेंच्या कार्यातून दिसतो आहे.
Akola Farmers : पैशांची वाट पाहता पाहता पेरणीचा हंगाम गेला हातातून