महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : भाजप ही काँग्रेस खाणारी चेटकीण आहे

Congress : हर्षवर्धन सपकाळ यांचा जहाल प्रहार

Author

भाजप ही काँग्रेस खाणारी चेटकीण आहे, असा घणाघात करत हर्षवर्धन सपकाळांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा साधला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा भाजपवर घणाघात केला आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीतही भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसच्या नेते-कार्यकर्त्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे, अशी घणाघाती टीका केली. त्यांनी भाजपची तुलना काँग्रेस खाणाऱ्या चेटकीणीशी केली. ही उपमा राजकीय वर्तुळात चांगलीच गाजत आहे. सपकाळांनी दिलेला रोषाचा सुर लक्षवेधी ठरला आहे.

भाजपच्या सत्ताकांक्षेपुढे लोकशाही मूल्यांचे बळी जात आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र भाजप सातत्याने रचत आहे. ही मानसिकता महाराष्ट्राच्या राजकीय आरोग्यासाठी घातक ठरते आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

Prakash Ambedkar : गौतम बुद्धांच्या रत्नांवरून आंबेडकरांचा संताप 

सलोखा भंगाचा डाव

हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात जातीपातीचे विष पसरवले जात आहे. काही शक्ती जाणीवपूर्वक या राज्याच्या थोर परंपरेला कलंकित करत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

सपकाळ म्हणाले की, काही ठिकाणी आपल्याच जातीच्या माणसाकडून खरेदी करा, असे सांगितले जात आहे. यातून सामाजिक विघटन वाढीस लागते आहे. संतोष देशमुख नावाच्या सरपंचाची हत्या ही त्याच विघटनाची एक भयंकर झलक होती. या घटनांमुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे रोखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जबाबदारीने वागावे लागेल.

Ajit Pawar : दांडी एका कार्यक्रमाची, सुरुवात अनेक चर्चांची 

फोडणीची यंत्रणा उघड

काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये सामील व्हावेत यासाठी भाजपकडून केले जाणारे प्रयत्न हे केवळ राजकीय नाहीत. तर नैतिकतेचाही पातळी गाठणारे असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी ठामपणे नमूद केले. भाजपने काँग्रेसला रिकामी करण्याचे जणू धोरणच आखले आहे. हे धोरण महाराष्ट्रात भूतकाळातही दिसून आले आहे. भविष्यातही लोकशाहीच्या दृष्टीने हे धोकादायक ठरू शकते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच केलेले वक्तव्य म्हणजे विरोधकांची फोडणी करत संघटना वाढवण्याचा स्पष्ट संकेत आहे. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा हे त्यांच्या शब्दात दिसून येते. हे सांगताना ते इतके पुढे गेले की काँग्रेसमध्ये काहीच शिल्लक नाही, असा दावा केला. ही भाषा सत्तेच्या माजाची आणि लोकशाहीच्या तत्त्वांशी प्रतारणा करणारी असल्याची टीका सपकाळांनी केली आहे.

 

भविष्यासाठी आशेचा सूर

हर्षवर्धन सपकाळ यांनी असेही सांगितले की, काँग्रेस पक्ष अजूनही विचारांचा, कार्यकर्त्यांचा आणि जनतेच्या विश्वासाचा आधार आहे. भाजप जरी सत्तेच्या जोरावर प्रचार करत असला, तरी जनतेच्या मनात असंतोष आहे. हे असंतोषाचे वातावरण आगामी निवडणूकीत परिवर्तनाचे वारे घेऊन येईल.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष सामाजिक समतेचा, बंधुतेचा आणि घटनेतील मूल्यांचा खरा रक्षक आहे. जातीय द्वेष, राजकीय सौजन्याचा अभाव आणि विरोधकांची फोडणी करणाऱ्या भाजपच्या नीतीचा सर्वसामान्य मतदार आता कंटाळला आहे. काँग्रेस पुन्हा ताकदीने उभी राहील, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!