
नाशिकच्या पवित्र मातीवर रामनवमीच्या दिवशी संविधान हाती घेऊन काळाराम मंदिरात प्रवेश करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांनी समतेचा ऐतिहासिक दिवा पुन्हा पेटवला. बाबासाहेबांच्या अपूर्ण लढ्याला सामाजिक न्यायाची दिशा देणारे हे पाऊल महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या इतिहासात नवा अध्याय ठरले.
रामनवमीच्या पवित्र दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात भारतीय संविधान हाती घेऊन प्रवेश करत एक विधायक आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळातील मंदिर प्रवेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश केवळ धार्मिक नाही. हा सामाजिक समतेचा नवा अध्याय ठरला. या सोहळ्यात त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांना वंदन करत भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेचे प्रतिकात्मक दर्शन घडवले.

सपकाळ यांच्यासोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, खासदार डॉ. शोभा बच्छाव व काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता. त्यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले आणि कालाच्या प्रवाहात नाकारले गेलेल्या सामाजिक सन्मानाला पुनःप्राप्त करण्याची जनचळवळ निर्माण केली. मंदिरातील महंतांनीही स्वागतपूर्वक सहभाग नोंदवून ऐतिहासिक गैरसमजुतीच्या भिंती पाडण्याचे संकेत दिले.
Congress : गोंदियात नानांचा ‘हात’ गेला निसटून, ‘कमळ’ आलं फुलून
संविधानाच्या छायेत प्रबोधन
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी 1930 साली काळाराम मंदिर प्रवेशासाठी चालवलेला सत्याग्रह ऐतिहासिक ठरला होता. पाच वर्ष, 17 दिवस चाललेल्या त्या संघर्षाला आज सन्मानाचा पुनःप्रत्यय देण्यात सपकाळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आजचा दिवस म्हणजे केवळ धार्मिकता नव्हे, तर समतेच्या नवचैतन्याचा उत्सव ठरला.
सपकाळ यांनी महंतांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. हे संविधान म्हणजे समानतेचा, बंधुत्वाचा आणि सामाजिक न्यायाचा पाया आहे. तोच देशाच्या एकतेचा कणा आहे. सपकाळ यांनी देशात आणि राज्यात संविधानाचे मूल्य जोपासण्याचे वचन देत सर्वसमावेशकतेचा नवा दृष्टिकोन साकार केला.
सत्तेच्या केंद्रस्थानी समता
वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने भाजपा सरकार धार्मिक संस्थांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याच्या रणनीती राबवत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. त्यांनी स्पष्ट केले की, पद्मनाभ मंदिरातील प्रचंड सोन्याच्या साठ्यावर अधिकार मिळवण्यासाठी भाजपा सरकार कायदेच्या नावाखाली खेळ रचत आहे. धार्मिक स्वतंत्रता आणि प्रार्थनास्थळांचे संरक्षण हे संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आहे. त्याच्या विरोधातील प्रत्येक हालचाल ही लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना धक्का देणारी आहे.
आजही बहुजन, शोषित, वंचित घटकांच्या प्रगतीच्या संधींवर दरवाजे बंद केले जात आहेत, असा आरोपही सपकाळ यांनी केला. काळाराम मंदिर प्रवेशास नकार दिला गेला तसाच अन्याय आज विकासाच्या क्षेत्रात बहुजन समाजावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून केवळ दिखाऊ निर्णय घेतले जात आहेत. पण सामाजिक समतेच्या दिशेने कोणतीही ठोस कृती दिसून येत नाही.
राजकीय सामाजिक समन्वय
राहुल सोलापुरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यासारख्या व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा सातत्याने अवमान होत आहे. त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी सपकाळ यांनी केली. ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या अपमानास्पद उल्लेखावरही त्यांनी संताप व्यक्त केला आणि केंद्र सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी ठाम मागणी नोंदवली.
संपूर्ण कार्यक्रमात काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. राज्यभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय, समता, आणि संविधानाच्या मूलभूत मूल्यांसाठी लढा देत आहे. त्यांची भूमिका केवळ राजकीय विरोधासाठी नसून एक व्यापक सामाजिक चळवळ उभी करण्याची आहे. रामनवमीच्या दिवशी संविधान हाती घेऊन मंदिर प्रवेश करणारे ते एकमेव नेते ठरले आहे. त्यांच्या या कृतीने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.