
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सिंधुदुर्गमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात सध्या जोरदार घडामोडी सुरू आहेत, आणि त्यात आता काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गातील राजकारण म्हणजे राणे कुटुंबाची मक्तेदारी, अशीच ओळख निर्माण झाली होती. मात्र, आता काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तिथे पाय रोवण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी थेट भाजप सरकारवर आणि राणे कुटुंबावर हल्लाबोल करत, कोकणात पुन्हा काँग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प केला आहे.
सिंधुदुर्गात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘राणेंच्या स्वार्थी राजकारणामुळे सिंधुदुर्गातील काँग्रेसची शक्ती कमी झाली होती. पण आता आम्ही पुन्हा नव्या उमेदीने संघटन बांधणार आहोत.’ नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, सत्ता उपभोगली आणि सत्ता गेल्यावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या राजकीय प्रवासावर सपकाळ यांनी जोरदार टीका केली. ‘काँग्रेसच्या ताकदीवर ते वाढले, पण सत्ता गेल्यावर त्यांनी पक्ष बदलला. मात्र, सिंधुदुर्ग काँग्रेसमय करणे हा आमचा संकल्प आहे,’ असे ते म्हणाले.

Yashomati Thakur : महाराष्ट्राची माती द्वेषाच्या वाळुसारखी उडून जाणार नाही
झटका विरुद्ध हलाल
सपकाळ यांचा विरोध केवळ राणेंपर्यंत मर्यादित नाही. त्यांनी भाजपच्या संपूर्ण सरकारवर टीकास्त्र डागले. फडणवीस सरकारने महाराष्ट्रात सामाजिक सलोखा संपवण्याचे काम केले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री हा वेगळा नमुना आहे, कोणीतरी ‘हम करो सो कायदा’ म्हणतो, तर कोणी ‘सैराट’ वागत आहे. लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली करण्याचा हा प्रकार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
महाराष्ट्रात सध्या ‘झटका विरुद्ध हलाल’ असा नवीन वाद निर्माण झाला आहे. मत्स्य पालन मंत्री नितेश राणे यांनी हिंदूंनी झटका मटण खावे, हलाल मटण खाऊ नये, असे वादग्रस्त विधान केले होते. यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. “राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. सत्ताधारी पक्षातील लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राणे समाजात फूट पाडण्याचे उद्योग करत आहेत, याला जनतेने आता आळा घालायला हवा, असं काहींनी म्हटलं आहे.
कोकणात काँग्रेस पुन्हा
सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना एकजूट होण्याचे आवाहन केले. हा जिल्हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, प्रेमाचा संदेश देणारे मंगेश पाडगावकर आणि महान नेते मधू दंडवते, नाथ पै यांचा आहे. या भूमीत सभ्यता आणि संस्कृती रुजली आहे. मात्र, आज भाजपच्या राजकारणामुळे येथे गटारगंगा वाहत आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. ‘रस्त्यावर उतरा, जनतेचे प्रश्न हाती घ्या, आंदोलने करा, ‘झुकेगा नही साला’ या भावनेने काँग्रेससाठी लढा, असे त्यांनी प्रोत्साहन दिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवावा, यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्याचे ठरवले आहे.
भाजपवर टीका
शिवाजी महाराजांच्या वारशावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर कडाडून हल्ला केला. ‘शिवरायांच्या मृत्यूनंतर 200 वर्षे त्यांची समाधीही हरवली होती. महात्मा फुलेंनी ती शोधून काढली. तेव्हा भाजपच्या तत्कालीन पिल्लावळींना शिवरायांचा इतिहास पुढे आणायचा नव्हता. आजही भाजप सरकार त्याच विचारसरणीने वागत आहे. या विध्वंसक विचारांना आता रोखले पाहिजे, असे त्यांनी ठणकावले.