
हिंदी सक्ती नाही सहन होणार. मराठी जनतेचा संयम संपत आला आहे, आणि आता रस्त्यावर उतरून आपल्या भाषेच्या अस्तित्वासाठी लढण्याचा निर्धार झाला आहे. सरकारने घेतलेल्या हिंदी सक्तीच्या अन्याय्य निर्णयाला महाराष्ट्रात प्रबळ विरोध होत असून, आझाद मैदानावर जनतेचा संताप स्फोटाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्च्याच्या आधीच सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल, अशी इशारवजा भविष्यवाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
हिंदी सक्तीचा शासन निर्णय जाहीर होताच, महाराष्ट्रात संतापाचा लाटा उसळल्या. हा लढा केवळ भाषेचा नाही तर अस्मितेचा आहे, असे म्हणत काँग्रेससह अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी या निर्णयाविरोधात उघडपणे आवाज उठवला आहे. आझाद मैदानावर मराठी भाषा केंद्र, राजकीय पक्ष आणि समविचारी संस्थांनी एकत्र येत प्रतीकात्मक होळी करत शासनाच्या धोरणांचा जाहीर निषेध केला. या होळीत पेटली ती फक्त सरकारी आदेशांची प्रत नव्हती, तर त्या मागील एकसांस्कृतिक कटकारस्थानांची राख झाली.
बनावट संघर्ष
नंतर मराठी पत्रकार संघात झालेल्या भाषणात हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत स्पष्ट केले, हिंदू, हिंदी आणि हिंदुराष्ट्र हा संघाचा अजेंडा आहे. भाजपाचे हिंदुत्व हे केवळ ‘नमस्ते सदा वत्सले’ पर्यंत मर्यादित आहे. ते संस्कृतीचा खरा सन्मान करत नाही. भाषेच्या नावावर दुही पसरवून महानगरपालिका निवडणुकीसाठी मराठी विरुद्ध हिंदीचा बनावट संघर्ष उभा केला जात आहे. हे पाकिस्तान-भारतसारखे युद्ध भडकवण्याचा भाजपाचा धूर्त डाव आहे.

सपकाळ यांनी भाषेच्या ऐतिहासिकतेकडे लक्ष वेधत सांगितले, हिंदी भाषा 800 वर्षांची म्हणतात, तर मराठी दोन हजार 300 वर्षांची. तरीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही केंद्रीय विद्यापीठांमध्ये मराठी विभाग कुठे आहे? त्यासाठी किती निधी दिला? केवळ घोषणांच्या गाजरगप्पा पुरेशा नाहीत. त्यांनी केंद्र सरकारच्या असंख्य खोट्या आश्वासनांची आठवण करून दिली. प्रत्येक घरात नळ, नळात पाणी, 15 लाख रुपये, दोन कोटी रोजगार, हे सारे आश्वासने फसवी होती. मराठीसाठीही याच धर्तीवर फक्त मोठमोठ्या घोषणा होऊ नयेत.
मैदानात उतरले
सपकाळ यांनी स्पष्ट केले की हा केवळ मोर्चा नाही तर एका भाषेच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई आहे. “5 तारखेला मोर्चा निघणारच आहे, पण त्याआधीच सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल. मराठी संवर्धनासाठी आपण एकदिलाने मैदानात उतरलेले आहोत. हा संदेश संपूर्ण देशात पोहोचणार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आजचा हा लढा म्हणजे एक नवचैतन्य आहे. फक्त भाषेचे नव्हे, तर लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे रक्षण करणारे हे आंदोलन आहे. आझाद मैदानावर पेटलेली होळी म्हणजे एक इशारा आहे, मराठी माणूस जिवंत आहे, आणि त्याच्या अस्मितेवर घाला येईल तेव्हा तो गप्प बसत नाही.