
नागपूर दक्षिण मतदारसंघात पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढल्याचा खुलासा झाला आहे. या वाढीवर काँग्रेसने मतचोरीचा आरोप करत फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या एक वादळ उठले आहे. मतदार यादीतील अचानक झालेली आकडेवारीची वाढ, संध्याकाळी 5 नंतर झालेल्या मोठ्या प्रमाणातील मतदान आणि 45 दिवसांत सीसीटीव्ही फुटेज हटवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय, या सर्व गोष्टींनी नागपूर दक्षिण विधानसभेतील शांततेला खळबळीत बदलवले आहे.
नागपूर दक्षिण हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ. येथे अवघ्या पाच महिन्यांत तब्बल आठ टक्क्यांची मतदार वाढ झाल्याची नोंद उघडकीस आली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट आरोप करत हा “मतचोरीचा प्रकार” असल्याची टीका केली आहे. त्यांच्या मते, काही निवडणूक बूथवर तर ही वाढ 20 ते 50 टक्क्यांपर्यंत गेली आहे, जे “नैसर्गिकरीत्या अशक्य” असल्याचेही ते म्हणाले.

मतांची जादू
हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार वाढणे म्हणजे स्पष्टपणे निवडणूक प्रक्रियेतील घोळ आहे. अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे बीएलओंनी नोंदवले आहे. परंतु, निवडणूक आयोग मात्र गप्प आहे. तसेच त्यांनी पुढे असा सवालही केला की, लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत विधानसभेत प्रचंड बहुमत कसे मिळाले? मतांची आकडेवारी संध्याकाळी 5 वाजता नंतर एकाएकी इतकी का वाढली?
हर्षवर्धन सपकाळ यांच्या मते, या सर्व गोंधळामागे मोठे ‘सिस्टमॅटिक ऑपरेशन’ असल्याचा संशय आहे. त्यांनी विशेषतः दोन मुद्द्यांकडे लक्ष वेधले. पहिला म्हणजे संध्याकाळी 5 नंतर झालेल्या मतदानात आठ टक्क्यांची वाढ. दुसरा मुद्दा 45 दिवसानंतर सर्व सीसीटीव्ही फुटेज हटवण्याचा निर्णय. सपकाळ यांच्या मते, ही पावलं “मतचोरी लपवण्यासाठी” आहेत.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या आकडेवारीने गांधींचे उधळले आरोप
सीसीटीव्ही फुटेज
काँग्रेसने आता मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे, तसेच सर्व मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज जनतेसमोर सादर करण्याचाही आग्रह धरला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक आयोगाने जर पारदर्शकता राखली नसती, तर यंत्रणेवरचा विश्वास कोसळेल.
या प्रकरणावर सत्ताधारी भाजपाने अद्याप अधिकृतपणे कोणतेही विधान केलेले नाही. मात्र, हा विषय आता फक्त निवडणुकीपुरता न राहता, निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाच्या मुळावर घाव करणारा ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात आकस्मिक वाढलेली मतदारसंख्या, सीसीटीव्ही हटवण्याचे धोरण, आणि संध्याकाळनंतरच्या अनपेक्षित मतदानवाढीने आता गंभीर प्रश्न उभे केले आहेत. यातून काय निष्पन्न होते, हे येत्या काळात स्पष्ट होईल. पण एक नक्की की, लोकशाहीच्या मंदिरात पडलेली ही सावली सहज पुसता येणार नाही.