महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : मतपेटीतून चोरीचा महायज्ञ अन् संविधानाची आहुती

Congress : प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा भाजपवर हल्लाबोल

Author

इंदिरा गांधींच्या आणीबाणीवर टीका करणाऱ्या भाजपावर सपकाळांनी अघोषित आणीबाणीचा आरोप केला. मतचोरी, सेंगोलप्रकरणी आणि शाही मेजवानीवरूनही भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

एका बाजूला इंदिरा गांधींच्या आणीबाणीला ‘हुकूमशाही’ म्हणणारे, तर दुसऱ्या बाजूला मागील 11 वर्षे देशात सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीला पांघरूण घालणारे, भाजपाला संविधानाचं खरंच कौतुक आहे की, केवळ दिखावा? हा थेट सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर मतचोरीपासून ते सेंगोलपर्यंतचा आरोपांचा जबरदस्त हल्लाबोल केला.

देशात आणीबाणी लावण्याचा निर्णय इंदिरा गांधींना संविधानाच्या चौकटीत घ्यावा लागला होता. हे आता काँग्रेस सांगत नाही, खुद्द इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधींनीही काही घटनांवरील प्रशासकीय चुका मान्य केलेल्या आहेत. मात्र, या ऐतिहासिक प्रसंगाचा भाजप केवळ राजकारणासाठी उपयोग करत आहे. त्याचवेळी तत्कालीन संघप्रमुख बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं आणि जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी संघाचा काहीही संबंध नाही, हेही घोषित केलं होतं. मग भाजपाला देवरसांची ती भूमिका मान्य आहे की नाही? असा चिमटा सपकाळांनी भाजपला घेतला आहे.

अघोषित आणीबाणी

इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात देशाची संपत्ती उद्योगपतींना विकली नाही, बँका-खाणी-विमानतळ पथ्यावर घातले नाहीत. परंतु गेल्या 11 वर्षांपासून देशात एक ‘अघोषित आणीबाणी’ सुरू आहे. ज्यात सार्वजनिक संपत्ती लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालण्यात आली आहे, असं म्हणत त्यांनी धारावीपासून बँकांपर्यंत झालेल्या विक्रीचा सविस्तर उल्लेख केला. भाजपाचा भस्मासूर सध्या लोकशाहीच गिळायला निघाला आहे, अशी तीव्र टीका त्यांनी केली.

सपकाळ यांचा आणखी एक घणाघात होता, सरकारी जाहिरातीत राजमुद्रेला जागा न देता सेंगोल दाखवला गेला. सेंगोल हे कोणत्या विचारधारेचे प्रतीक आहे, हे वेगळं सांगायला नको, असं सूचक विधान करत त्यांनी हा संविधान बदलण्याच्या भाजपाच्या गुप्त अजेंड्याचा भाग असल्याचा आरोप केला. सेंगोल हा ‘बंच ऑफ थॉट्स’कडे नेणारा महामार्ग आहे, असा इशारा त्यांनी दिला.

Bachchu Kadu : कसाई सरकारला जनतेचे दुःख कळत नाही

शिदोरी’चा विशेष अंक

काँग्रेसच्या ‘शिदोरी’ मासिकाचा विशेष ‘आणीबाणी अंक’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या अंकात इंदिरा गांधी, पुपुल जयकर, कुमार केतकर, संजय राऊत आदींचे साक्षेपी लेख प्रकाशित झाले आहे. भाजपाच्या खोट्या प्रचारावर उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सत्य समोर येणार, झूठ प्रचार फाटणार, असं सपकाळांनी ठामपणे सांगितलं.

राहुल गांधींनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामधून फडणवीसांच्या मतदारसंघात आठ टक्क्यांची संशयास्पद मतवाढ उघडकीस आली आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी आरटीआयच्या माध्यमातून मिळवलेल्या माहितीतून, विशिष्ट मोबाईल नंबरवरून अनेक मतदारांची नोंद झाल्याचेही समोर आले आहे.

निवडणूक आयोगाने शहानिशा करण्याची सूचना केली असली तरी कारवाई झालेली नाही. मतचोरीप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईपर्यंत फडणवीसांनी पदावरून दूर व्हावे, अशी मागणी सपकाळांनी ठामपणे केली आहे.

पैशांची उधळपट्टी

धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक 102, येथे अंदाज समितीच्या लोकांनी तब्बल पाच हजार रुपयांचे शाही भोजन आणि 550 रुपयांच्या चांदीच्या ताटात जेवण घेतल्याचा सवालही सपकाळांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, बहिणीला दोन हजार 100 रुपये नाहीत. पण मेजवानीसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा संताप व्यक्त करत त्यांनी या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!