देश

Harshwardhan Sapkal : तिरंग्याच्या छायेतून भाजपवर डागली तोफ

Congress : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न

Author

पहलगाम दहशतवादी हल्ला, युद्धबंदीचं गूढ आणि तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली. राजकीय आरोप-प्रत्यारोपांत इतिहास, सुरक्षा आणि स्वाभिमानाचे मुद्दे केंद्रस्थानी आले.

पहलगाममधील निर्घृण हत्याकांडानंतर अतिरेकी सुखरूप परत कसे गेले? देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप सरकार इतके मौन का बाळगते? या प्रश्नांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खरमरीत टीका केली. नांदेड येथे जय जवान, जय किसान, जय हिंद तिरंगा रॅलीच्या निमित्ताने झालेल्या सभेत सपकाळ यांनी भाजप सरकारला थेट जाब विचारला.

पहलगाममध्ये 300 किमी आत घुसून 26 निरपराध नागरिकांची हत्या करणारे अतिरेकी परत गेले आणि आजतागायत सरकार त्यांना शोधू शकलेले नाही, हेच सरकारच्या अपयशाचे प्रतीक आहे. देशाची गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची जबाबदारी याबाबत प्रश्न उपस्थित होतात, अशी संतप्त प्रतिक्रिया सपकाळ यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ज्या क्षणी पाकिस्तानवर निर्णायक कारवाईची संधी होती, त्यावेळी अचानक युद्धविराम का करण्यात आला? हा युद्धविराम डोनाल्ड ट्रम्पच्या दबावामुळे का झाला, हे देशाला जाणून घ्यायचे आहे.

Akola : पावसाच्या तडाख्यात अडकलं शहर, प्रशासनाच्या छत्रीला छिद्र

काँग्रेसचा आरोप

सपकाळ म्हणाले, देशाच्या सीमांवर लढणाऱ्या जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जे साहस दाखवले त्याला सलाम. तसेच, आपल्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांचे योगदानही विसरता येणार नाही. तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यात अमित शाह यांनी नांदेडमध्ये सभा घेतली, पण प्रचारात दिलेल्या आश्वासनांवर ते गप्प राहिले, अशी टीका सपकाळ यांनी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांना दोन हजार 100 रुपये, मोफत दोन सिलिंडर, याविषयी एक शब्द नाही. युद्धविराम आणि अमेरिकेचा दबाव यावर स्पष्टीकरण नाही आणि फक्त काँग्रेसवर टीका, हे भाजपचे नवे राजकारण आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

सपकाळ यांनी आपल्या भाषणात भाजपचा इतिहास उलगडत म्हटले, भाजपचे वैचारिक पूर्वज म्हणजे जनसंघ. याच जनसंघाने मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुस्लीम लीगशी युती करून सरकार स्थापन केले होते. श्यामा प्रसाद मुखर्जी या सरकारचे भाग होते. आज जे लोक देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटतात, त्यांच्या संघटनांनी स्वातंत्र्य चळवळीत कोणते योगदान दिले? ते पुढे म्हणाले, संघाच्या कार्यालयावर 50 वर्ष तिरंगा फडकवला गेला नाही. आणि आज हेच लोक तिरंग्यावर भाष्य करतात, हे दुर्दैव. नांदेडमध्ये भाजपने शंखनाद सभा घेतली.पण भाजपला शंख कधी फुंकतात याचेही भान नाही, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.

Yashomati Thakur : राहुल गांधींच्या अवमानावर काँग्रेसचा संताप

नांदेडमधील काँग्रेस विरोधात भाजपचा ‘शंखनाद’, पण…

कालपर्यंत काँग्रेसचे नेतृत्व करणारे काही नेते आज भाजपमध्ये गेलेत. काँग्रेसमध्ये असताना महाराष्ट्र केसरी असलेले अशोक चव्हाण आता जत्रेत कुस्ती खेळत आहेत. त्यांच्या वडिलांनी हिंद केसरी शंकरराव चव्हाण यांनी देशासाठी मोठे योगदान दिले. संरक्षण मंत्री व गृहमंत्री म्हणून त्यांचे कार्य लक्षणीय होते. पण त्यांच्या कार्याचा अपमान नांदेडच्या सभेत अमित शाहांनी केला आणि यावरही अशोक चव्हाण गप्प का, हे समजून घेतले पाहिजे, असा रोखठोक सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला.

काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिले. इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. राजीव गांधी, इंदिराजींनी देशासाठी बलिदान दिले. जय जवान, जय किसान ही घोषणा लाल बहाद्दूर शास्त्रींनी दिली. हे आमचे वारसत्व आहे. यावर भाजपचा एक शब्द चालणार नाही, असे सांगून सपकाळ यांनी भाजपला सजगतेने विचार करण्याचा इशारा दिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!