महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मतचोरीचा गंभीर आरोप करत निवडणूक आयोग आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.
2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. मतदारांच्या जबरदस्त पाठिंब्यामुळे काँग्रेसमध्ये पुनरागमनाचा विश्वास जागृत झाला होता. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरलेले होते. पण महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर राजकारणाच्या रंगभूमीवर अचानक नवीन वळण आले. महायुतीने महाविकास आघाडीला मागे टाकून सत्ता परत मिळवली. ज्यामुळे काँग्रेसच्या चेहऱ्यावरचा विजयाचा आनंद थोडा विरळा झाला. या घडामोडीने संपूर्ण राजकीय वातावरण गोंधळले आणि काँग्रेसने मतचोरीचे आरोप जोरदारपणे मांडायला सुरुवात केली.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोग आणि भाजपावर थेट आणि गंभीर आरोप करत राजकारणात तहकूब उडवून दिली. त्यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने कशी मतचोरी केली याचे पुरावे देशासमोर मांडले. ज्यामुळे देशभरात खळबळ उडाली. या घडामोडींनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे स्वरूप घेतले. दादरमध्ये तासभर चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग आणि भाजपाची खरपूस खिल्ली उडवली.
लोकशाही धोक्यात
राहुल गांधींच्या पुराव्यांवरून मतदानातील मोठ्या घोटाळ्याचा आरोप ठामपणे केला. सपकाळ म्हणाले, निवडणूक आयोगाने आणि केंद्र सरकारने या घोटाळ्याची गंभीर चौकशी करायला हवी होती. पण ते होण्याऐवजी राहुल गांधींवरच चुकीची कारवाई केली जात आहे. सपकाळ यांनी निवडणूक आयोगाच्या 1960 नियमावलीतून 17, 18, 19 नंबरच्या नियमांनुसार कोणतीही हरकत नोंदवल्यास ताबडतोब चौकशी करण्याचे आदेश असल्याचेही स्पष्ट केले. पण सरकार आणि आयोगाने अजूनही कोणतीही कारवाई का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सपकाळांनी खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हटले, हे ‘चिफ मिनिस्टर’ नाहीत, तर ‘चिप मिनिस्टर’ आहेत.
फडणवीस यांनी निवडणूक आयोगाचे रक्षण करण्यासाठी जी भाषा वापरली, त्यातून त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. केंद्र गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची आयोगाचा बचाव करत असलेली भूमिका ‘दाल में कुछ काला है’ म्हणण्याच्या पेक्षा संपूर्ण दालच काळी असल्याचा पुरावा देते, असा आरोप सपकाळांनी केला. मतचोरी विरोधात काँग्रेस महाराष्ट्रभर रॅली, पदयात्रा आणि यात्रा यांसह जोरदार आंदोलन करण्याचा इरादा बाळगत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतदानावेळी हरकत का नोंदवली नाही, असा भाजपाकडून प्रश्न करून भ्रम पसरवला जात आहे. खऱ्या घडामोडी प्रकाशात आल्या आहेत.
पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केल्या आहेत. मतदानावेळी आणि त्यानंतरही काँग्रेसने हरकती आणि पुरावे निवडणूक आयोगाला दिले असून देखील आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मतचोरीची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या आंदोलनाला अधिक वेग देत देशातील लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेच्या शुद्धतेसाठी लढा देण्याचा संदेश दिला आहे.