
हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचा भाजपविरोधातील लढा सुरूच राहील असे स्पष्ट केले. लोकशाही व संविधान रक्षण हे पक्षाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे की, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी झगडणाऱ्या प्रत्येक पक्षासोबत काँग्रेस उभी राहणार आहे. भारत जोडो, हा काँग्रेसचा आत्मा आहे. त्याच विचाराने राजकीय समीकरणं जुळवली जातील, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचा एकत्र येण्याचा निर्णय हा कोणताही आक्षेप निर्माण करणारा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष कोणत्याही विघटनवादी विचारधारेच्या विरोधात आहे. जर दुभंगलेली मनं, पक्ष किंवा बंधुभाव एकत्र येत असेल, तर ती लोकशाहीसाठी सकारात्मक बाब आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यास काँग्रेसकडून विरोध नाही. मात्र, यासंबंधी काही ठोस राजकीय पावलं उचलल्यावरच अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

देशहितासाठी एकवटण्याचे आवाहन
राज्यातील महाविकास आघाडी ही काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचा युतीप्रक्रियेतून साकारलेली रचना आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं की, काँग्रेस पक्ष आजही या युतीच्या माध्यमातून भाजपाविरोधात लढत आहे. शरद पवार हे इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या भूमिका काँग्रेसला मान्य आहेत. काही नवीन राजकीय घडामोडी झाल्यास, काँग्रेस त्यानुसार निर्णय घेईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्थानिक पातळीवरच निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या ऑपरेशन सिंदूरला काँग्रेसचा ठाम पाठिंबा असल्याचेही सपकाळ यांनी जाहीर केले. त्यांनी सांगितले की, 26/11 वेळी आपण फाटलेला समाज पाहिला. मात्र, यावेळी देश एकसंघ उभा आहे, हे विशेष सकारात्मक चित्र आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे. काँग्रेस केंद्र सरकारसोबत आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईसाठी खंबीरपणे पाठीशी उभी राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दहशतवादावर कठोर भूमिका
दहशतवादाचे मूळ उपटण्यासाठी एकदिलाने लढणे आवश्यक असल्याचे सांगून हर्षवर्धन सपकाळ यांनी नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. समाजात भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आणि राजकीय हेतूने वावगे वातावरण तयार करणाऱ्या प्रवृत्तींना थांबवले पाहिजे. चुकीच्या घटनांना बळी पडू नये. देशहितास प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत होते.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यातून काँग्रेसची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. काँग्रेस पक्ष देशाच्या एकतेचा, लोकशाहीच्या रक्षणाचा आणि संविधानाच्या मूल्यांचा कट्टर पुरस्कर्ता आहे. सध्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात, एकत्र येण्याचे आणि लोकशाही जपण्याचे सुसंवादात्मक आवाहन हेच काँग्रेसचे खरे बळ असल्याचे या भूमिकेतून स्पष्ट होते.