महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : ‘सौगात-ए-मोदी’ म्हणजे निव्वळ ढोंग

Congress : सरकारच्या खोट्या आश्वासनांचा पाढा वाचत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

Author

भाजपने ‘सौगात-ए-मोदी’च्या माध्यमातून मुस्लिम समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, काँग्रेसने याला दिखावा आणि फसव्या आश्वासनांची नवी फेरी असल्याचा आरोप केला आहे.

दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, पेट्रोल 40 रुपये लिटर, विदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये, हे सर्व फसवे आश्वासन ठरले. आता अचानक ‘सौगात-ए-मोदी’सारख्या योजनांच्या नावाखाली भाजप मुस्लीम समाजाला भुलवण्याचा प्रयत्न करत आहे. ही योजना म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ या म्हणीचा जिवंत प्रत्यय आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

ईदच्या निमित्ताने भाजपने 32 लाख मुस्लीम कुटुंबांना ‘सौगात-ए-मोदी’ किट देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेला लक्ष्य करत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “गुजरात दंगलीत हजारो अल्पसंख्यांकांवर अत्याचार झाले, अनेकांना मॉब लिंचिंगला सामोरे जावे लागले. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत भाजपने मुस्लीम समाजावर अन्यायाची मालिका सुरूच ठेवली. त्यांना एकही निवडणूक तिकीट दिले नाही, मंत्रिमंडळात स्थान दिले नाही, उलट त्यांच्या विरोधात सतत विषारी वक्तव्ये करण्यात आली. अशा पक्षाकडून अचानक ‘सौगात’ मिळणे म्हणजे भंपकपणाचा कळस नाहीतर काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भुलवण्याचा केविलवाणा प्रयत्न

सपकाळ यांनी नमूद केले की, 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी दिलेली मोठी आश्वासने आजही पूर्ण झालेली नाहीत. “कुठे गेले दोन कोटी रोजगार? कुठे गेले शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न? पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले, तर काळा पैसा परत आणण्याचे स्वप्न हवेत विरले. आता ‘सौगात-ए-मोदी’च्या माध्यमातून लोकांना पुन्हा फसवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असे सपकाळ म्हणाले.

Chandrapur : राजकीय दुर्लक्षामुळे वर्धा-वैनगंगा मृत्यूपंथाला

हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार इशारा दिला की, जनतेने भाजपच्या फसव्या घोषणा ओळखल्या आहेत. ‘सौगात-ए-मोदी’ ही योजना नाही, तर भाजपच्या खोट्या आश्वासनांची पुढील फेरी आहे. मात्र, यावेळी जनता गप्प बसणार नाही. आगामी निवडणुकीत खऱ्या अर्थाने भाजपला सडेतोड उत्तर देईल.

ठाकरेंचाही भाजपवर प्रहार

उद्धव ठाकरे यांनीही याच मुद्यावरून भाजपवर टीकेचा भडिमार केला. भाजप आता सौगात वाटत आहे, पण त्यांना हे ‘सौगात-ए-मोदी’ नाही, तर ‘सौगात-ए-सत्ता’ आहे. आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणारे आता अचानक मुस्लिम समाजाला सन्मान दाखवू लागले. हे ढोंग नाहीतर काय?” असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.

ठाकरे पुढे म्हणाले, पहिल्यांदा म्हणाले की मंगळसूत्र धोक्यात आहे. मग हिंदूंचे संरक्षण कोण करणार असा गाजावाजा केला. पण आता त्यांच्या याच हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर ते गप्प का? भाजपने प्रथम विषारी विचारधारा पसरवली आणि आता लोकांना भुलवण्यासाठी धान्य वाटत आहेत. पण हा दिखावा केवळ बिहार निवडणुकीपुरता आहे का? भाजपने स्पष्ट करावे की त्यांनी हिंदुत्व सोडले आहे, की हे केवळ राजकीय स्टंट आहे?

एकीकडे ‘सौगात-ए-मोदी’ योजना जाहीर केली जाते, तर दुसरीकडे नमाजावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जातो. ही बंदी बिहारमध्येही लागू करणार का? एकीकडे ‘सौगात’ आणि दुसरीकडे मुस्लीम समाजावरील बंधने—हे भाजपचे दुटप्पी राजकारण नाही तर काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!