
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या विकृत प्रवृत्तींचा महाराष्ट्रात उघडपणे गोंधळ सुरू झाला आहे. भाजपच्या सत्ताकाळात या प्रवृत्तींना पाठबळ, सुरक्षा आणि गौरव मिळत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा अवमान करणाऱ्यांची दृष्टीधारणाच जळकी आहे आणि भाजप शासन त्यावर डोळे झाकून बसले आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालणाऱ्या या विकृत प्रवृत्तींना आता सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय ‘कडेलोटा’ची वेळ आली आहे, असा थेट आणि झणझणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिला.
गांधी भवन, मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी सरकारवर आणि विशिष्ट प्रवृत्तीवर कठोर शब्दांत घणाघाती टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे अधिष्ठान आहेत. त्यांनी उभारलेल्या राजवटीत सर्व जातीधर्मांना सन्मान आणि स्थान होतं. त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणं म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांनाच धक्का देणं, असे ते म्हणाले.

स्वाभिमानाची विटंबना
सपकाळ म्हणाले, पुण्यातील शिवसृष्टीमध्ये कुलकर्णी नावाच्या एका विकृताने लघुशंका केली, आणि त्याची पत्नी हे कृत्य रेकॉर्ड करत होती. हा प्रकार आकस्मिक नसून नियोजित आहे. हा कुलकर्णी म्हणजे अफजलखानाचा वकील भास्कर कुलकर्णीची औलाद आहे. त्याच्या मनात शिवरायांबद्दल आदर नसून विष आहे.
त्यांनी अधिक सांगितले की, हीच ती जमात जी सावित्रीबाई फुले यांना विरोध करणारी, तुकाराम महाराजांची गाथा बुडवणारी आणि काळाराम मंदिरात दलितांना विरोध करणारी होती. ही विकृती आज नव्या स्वरूपात उभी राहत आहे. पण भाजप सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण आणि पुरस्कार देत आहे, हे संतापजनक आहे.
Sunita Jamgade : पाकिस्तान गाठलेली सुनिता, आता कारगिल पोलिसांच्या तावडीत
योगी आदित्यनाथांवरही हल्लाबोल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून रामदास स्वामी यांचे नाव घेतल्याचा खोटा इतिहास रचल्याचा आरोप करत सपकाळ म्हणाले, “रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे सन्माननीय सल्लागार होते, पण गुरु नव्हते. भाजप पुरस्कृत इतिहासाचा हा अपप्रचार महाराष्ट्राला मान्य नाही.
योगी आदित्यनाथांनी शिवरायांचा जिरेटोप घालून फोटो काढले, आणि याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तेच केलं होतं. या जिरेटोपाला महाराजांच्या अस्तित्वाशी संबंधित पवित्रता आहे. त्या प्रतीकाचं अशा प्रकारे राजकीय ‘प्रॉप्स’मध्ये रूपांतर करणं म्हणजे महाराजांच्या प्रतीकांचा अपमान आहे, असे ते ठासून म्हणाले.
अस्मितेला काळं केलं
सपकाळ यांनी भाजपवर अत्यंत तीव्र शब्दात आरोप करत सांगितले की, आज ज्या कोरटकर, सोलापूरकर, कुलकर्णीसारख्या लोकांकडून महाराजांचा अपमान केला जातोय, त्यांना भाजप सरकारकडून सुरक्षा व पुरस्कार मिळतात. हे सरकार महाराजांचा अपमान करणाऱ्यांची पाठराखण करतंय. मग महाराष्ट्रात अस्मिता जिवंत राहणार कशी?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ब्राह्मण समाजाने महाराष्ट्राला साखर घालण्याचे काम केले’ या विधानावर उत्तर देताना सपकाळ म्हणाले, हे विधान एकांगी आणि संकुचित आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाने, मग तो कुठल्याही जातीचा असो, महाराष्ट्राच्या घडणीत आपलं योगदान दिलं आहे. केवळ ब्राह्मण समाजच नाही, तर वंचित, मागास, दलित, ओबीसी, आदिवासी, सगळ्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीत अमृत ओतलं आहे. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, लाल बहादूर शास्त्री यांची जात कधी सांगावी लागली नाही, कारण त्यांच्या कार्याची ओळख त्यांची खरी जात होती, असं सांगत सपकाळ यांनी जातीय राजकारणावरही घणाघात केला.
शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते, ते महाराष्ट्राच्या रुधिरात भिनलेली ओळख आहेत. त्यांच्या राज्याभिषेकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना सरकारकडून बळ देणं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासावर काळं फासणं. आता वेळ आली आहे की, जनतेनेच यांना झुगारून द्यावं. छत्रपतींच्या महाराष्ट्रात ही घाण झेलायची नाही, असा आक्रमक निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी या पत्रकार परिषदेत नोंदवला.