महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : पूल वाहून जाते, सरकार जबाबदारी टाळते 

Pune Bridge : इंद्रायणीपूल दुर्घटना आणि शिवरायांच्या पुतळ्यावरून काँग्रेसचा हल्ला

Author

इंद्रायणी पूल दुर्घटना आणि शिवरायांच्या पुतळ्याचं भगदाड, हे अपघात नाहीत, तर सरकारी दुर्लक्षाचे गंभीर परिणाम आहेत, असे सांगत काँग्रेसने जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धूमशान घातलेले आहे. पुणे जिल्ह्यातील कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. ही घडलेली भीषण दुर्घटना हे केवळ निसर्गाचे नव्हे, तर सरकारी यंत्रणांच्या अक्षम्य हलगर्जीपणाचे विदारक उदाहरण ठरले आहे, असा घणाघात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी स्पष्ट शब्दांत सरकारवर निशाणा साधला आहे. हा अपघात नाही, ही सरकारी दुर्लक्षातून घडलेली शोकांतिका आहे. ही बळी नाहीत, हे अनधिकृतपणे घेतलेले प्राण आहेत. मृतांचे शोकसंदेश पुरे झाले, आता गुन्हे दाखल व्हावेत.

सपकाळ म्हणतात की, सरकार म्हणतं निधी मंजूर केला होता. मग वर्षभर काम का नाही झालं? पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी माहित असूनही तो धोकादायक पूल खुला का ठेवला? हे सरकार दुर्घटनांच्या वेळीच झोपेतून उठते. प्रशासन म्हणतं ‘पाटी’ लावली होती. म्हणजे जीव वाचवण्यासाठी पाटी पुरेशी आहे का? अशी पाटी लावून प्रशासनाने जबाबदारी झटकली आणि सरकारने ‘पाट्या टाकणं’ सुरू ठेवलं. त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटलं, 55 पर्यटक वाहून गेले. त्यात चार ठार, सहा गंभीर जखमी. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देऊन सरकारने आपली जबाबदारी फुकटात सोडवून घेतली. पण जीव गेलेत, ते परत येणार आहेत का?

केविलवाणा उपाय

दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले. यावर टीका करताना सपकाळ म्हणाले, “हा प्रकार म्हणजे वरातीमागून घोडं! लोक मरल्यानंतर ऑडिट कशासाठी? जीवितहानी टाळण्याऐवजी जीव गमावल्यावर उपाययोजना करणं म्हणजे सरकार लोकांच्या जीवाशी खेळतं आहे हे अधोरेखित करतं. दरम्यान, सपकाळ यांनी दुसरी एक धक्कादायक बाब समोर आणली. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर अवघ्या महिन्यात मोठं भगदाड पडल्याची घटना. त्यांनी विचारले, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 11 मे रोजी उद्घाटन झालेल्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर इतक्या लवकर भगदाड पडणं म्हणजे बांधकामाचा दर्जा काय होता?

Amravati : वीज संकटामुळे महावितरण कार्यालयात भडका

महाभ्रष्ट महायुती

हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पहिल्या पुतळ्याचाही उल्लेख केला. आठ महिन्यांत तो पुतळा पडला होता. संतप्त जनतेमुळे नवा उभारण्यात आला. पण पुन्हा भ्रष्टाचार? म्हणजे महापुरुषांच्या स्मारकांनाही ही महाभ्रष्ट महायुती माफ करत नाही, अशी जहाल टीका त्यांनी केली. सपकाळ यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, जोपर्यंत अशा घटनांमध्ये दोषींना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत कोणीही गांभीर्याने जबाबदारी घेणार नाही. निष्पाप लोक मरत राहतील आणि सरकार फक्त ‘शोक व्यक्त’ करत राहील.

या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेसचा रोख स्पष्ट आहे, हा मुद्दा राजकारणाचा नाही, लोकांच्या जीवितहानीचा आहे. इंद्रायणी पूल दुर्घटना असो किंवा शिवरायांच्या पुतळ्याचे भ्रष्टाचारी बांधकाम, हर्षवर्धन सपकाळ यांच्या मते हे दोन्ही प्रकार जनतेच्या श्रद्धांवर आणि सुरक्षिततेवर घाव घालणारे आहेत. जबाबदारी निश्चित करून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!