
विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी हालचाल सुरू होती. अखेर नाना पटोले यांना हटवून हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचे कारभार सोपवले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करत हर्षवर्धन सपकाळ यांना ही जबाबदारी सोपवली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पक्षश्रेष्ठींनी सपकाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
राजकीय वर्तुळात प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख यांसारख्या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, काँग्रेसने चर्चेत नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना संधी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी नव्या चेहऱ्याला संधी देत महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे दिसते. यामुळे काँग्रेस मधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना धक्का बसला आहे.

कोण आहेत सपकाळ
सपकाळ यांनी तरुण वयात काँग्रेसमध्ये काम सुरू केले. जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वापासून ते आमदारकीपर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी.पी.एड. पदवी घेतलेल्या सपकाळ यांना समाजकारणाची आवड आहे.
1999 ते 2002 दरम्यान बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले सपकाळ 2014-2019 या कालावधीत बुलढाणा मतदारसंघाचे आमदार होते. शेती करत करत गेले अनेक वर्ष हर्षवर्धन सपकाळ समाजकारण करत आहेत. सपकाळ काँग्रेसचे सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून प्रामुख्याने ओळखले जातात.
नागनदीच्या पात्रात अतिक्रमणाचा कहर; Nagpur प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रदेशाध्यक्षपदी निवड
माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारभारावर पक्षांतर्गत नाराजी होती. पक्षश्रेष्ठींनी अधिक चर्चेत असलेल्या नेत्यांऐवजी स्वच्छ प्रतिमा असलेल्या, जनसंपर्क चांगला असलेल्या आणि पक्षाशी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष ते थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली.
सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. काँग्रेसच्या ग्रामीण विकास धोरणांशी ते निगडित असून महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांवर आधारित ग्रामस्वराज संकल्पनेवर त्यांनी काम केले आहे. 2014 च्या मोदी लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि चौरंगी लढत असतानाही हर्षवर्धन सपकाळ बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. भल्या भल्या मातब्बर उमेदवारांवर मात करत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या पक्षालाच विश्वास नसलेली सीट अलगद निवडून आणली.
कुणीच तयार नव्हते म्हणून Congress पक्षाला शोधावा लागला बळीचा बकरा
जातीय, प्रादेशिक समीकरण
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले हर्षवर्धन सपकाळ हे मराठा समाजातून आलेले आहेत. तर विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्त झालेले विजय वडेट्टीवार हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. या दोन्ही विदर्भातील नेत्यांची निवड करताना मराठा आणि ओबीसी हे जातीय समीकरण काँग्रेसकडून साधण्यात आलं आहे.
गेल्या काही वर्षातील राजकीय घडामोडी आणि राज्यातील विविधी जातसमुहांची पार्श्वभूमी पाहता या दोन्ही नेत्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाला याचा फायदा होईल, अशी पक्षाची धारणा आहे, असंही राजकीय जाणकार सांगतात.
बळीचा बकरा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका करत, “वरिष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष पद नाकारल्याने काँग्रेसने बळीचा बकरा शोधला,” असे विधान केले. मात्र, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सपकाळ यांच्या नियुक्तीचे स्वागत करत, “सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळणं ही काँग्रेसची खासीयत आहे,” असे मत व्यक्त केले.
काँग्रेसला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी मोठे आव्हान आहे. सपकाळ यांच्यासमोर पक्षाची गळती थांबवणे, काँग्रेसची ग्रामीण पातळीवरील पकड मजबूत करणे आणि युवकांना पक्षाशी जोडणे ही महत्त्वाची उद्दिष्टे असतील.