
नुकत्याच झालेल्या कुणाल कामरा यांच्या कार्यक्रमावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत महाराष्ट्रात तालिबानी प्रवृत्ती वाढत असल्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील सत्ताधारी भाजपा-शिवसेना युतीला महाराष्ट्रात कायद्याचा व संविधानाचा विसर पडला आहे का, असा गंभीर सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. प्रसिद्ध हास्यकलाकार कुणाल कामरा यांच्या कार्यक्रमावर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड ही केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला नाही. सरकारच्या हाताखालच्या पोलिसांना व गृहविभागालाही कचरल्याचे लक्षण आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, कुणाल कामरा यांनी त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नव्हते. तरीसुद्धा ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वतःवर घेत, स्टुडिओवर हल्ला केला. सरकारमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते जर कायदा हातात घेत असतील. तर त्यांना आपल्या सरकारवर, गृहविभागावर व कायदा-सुव्यवस्थेवर विश्वास नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सैनिकाच्या वारशावर हल्ला
कामरा यांचा कार्यक्रम ज्या स्टुडिओमध्ये झाला, त्याचे विशेष महत्त्व आहे. याकडे लक्ष वेधताना सपकाळ म्हणाले की, हा स्टुडिओ एका स्वातंत्र्य सैनिकाचा आहे. देश स्वतंत्र होईपर्यंत त्यांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला होता. स्वातंत्र्यानंतर त्यांनी वैवाहिक जीवन सुरू केले. त्यांच्या नफेखोरी न करता सुरू असलेल्या सांस्कृतिक मंचावर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवणं म्हणजे त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागावरच आघात आहे. या तोडफोडीत स्टुडिओचे जवळपास 25 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, या नुकसानाची भरपाई सरकारने त्वरित द्यावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
तोडफोड आणि हल्ला होत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होते. महाराष्ट्रातील पोलिसांची ही उदासीन भूमिका सरकारच्या दबावाखाली घडत आहे का, असा आरोपही सपकाळ यांनी केला. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे सरकारचे आणि पोलिसांचे कर्तव्य आहे. मात्र, सरकारच्या पाठबळावर कार्यकर्ते रस्त्यावर दहशत माजवत असतील, तर हा प्रकार महाराष्ट्राला तालिबानी पद्धतीने चालवण्याचा डाव आहे काय, असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दंगलीत अटक झालेल्या आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवून त्याच्याकडून नुकसानभरपाई वसूल केली. याचा संदर्भ देत सपकाळ म्हणाले, ‘तशीच कारवाई एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवर आणि दंगेखोरांवर केली जाणार आहे का? सरकार शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नुकसानभरपाई वसूल करणार का? याचबरोबर, फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी वारंवार चिथावणीखोर, भडकाऊ वक्तव्ये करून वातावरण तापवले आहे. मग त्यांच्या घरावरही बुलडोझर चालवण्याची हिंमत सरकार दाखवणार का, असा रोखठोक सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला.
लोकशाही धोक्यात
आज महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. जो काही आज घडत आहे तो केवळ एका स्टुडिओवरचा हल्ला नाही, तो महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, लोकशाहीवर हल्ला आहे,’ असे सपकाळ यांनी सांगितले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘सरकारने या तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली नाही. नुकसानभरपाई दिली नाही आणि पोलिसांना योग्य निर्देश दिले नाहीत. तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि राज्यभर आंदोलन उभारेल.’