
काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे राजकीय उलथापालथ होत असताना, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
टिळक भवन येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात सपकाळ यांनी पदभार स्वीकारला. पक्षातील दिग्गजांना डावलून पक्षश्रेष्ठींनी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. राहुल गांधी यांच्यातर्फे सकाळ यांना मिळालेले हे बक्षीस आहे, अशी चर्चाही काँग्रेसमध्ये सुरू आहे.
ढय्या लागली.. Parinay Fuke यांच्याशी दगा करणाऱ्यांना आता शिक्षा
सपकाळ यांची प्रतिक्रिया
प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया जेव्हा सुरु होती, तेव्हा मला विचारलं की काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोण चांगलं राहिल? तेव्हा मी आता व्यासपीठावर बसलेल्या सर्व लोकांनी नावं सांगितली होती. विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांची नावे मी सांगितली होती. परंतु निवड करत असताना एका व्यक्तीचीच करावी लागते आणि त्यामधून माझी निवड झाली, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं.
महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, आज मी शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या हिंद स्वराज्याच्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन आपण ज्या मार्गावर चालत आहोत त्याबद्दल बोलण्यासाठी आलो आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाचा आणि जगाचा इतिहास शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राचा अभिमान, सन्मान आणि वैभव शिवाजी महाराजांमध्ये आहे. त्यांची प्रेरणा आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
काँग्रेसचे येतील अच्छे दिन
विजय वडेट्टीवार म्हणाले की, दिवस बदलतात, काँग्रेसचे दिवस पुन्हा येतील. एवढं बहुमत मिळून देखील महायुतीत एकमेकांचं तोंड न पाहण्याचं काम सुरु आहे. नागपूरवाला एकीकडे तर पुण्यावाला दुसरीकडे आणि ठाणेवाला तिसरीकडे, असं सर्व सुरु आहे. त्यामुळे अशा सर्व परिस्थितीत आपल्याला संधी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. काँग्रेसचे वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपण काम करू, असा विश्वास मी तुम्हाला देतो”, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.