
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविरोधी केलेल्या वक्तव्याचा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील महायुती सरकार सत्तेत येऊन चार महिने झाले असले तरी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र, आता सत्ता स्थिरावताच हे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता काँग्रेसकडून हल्लाबोल करण्यात आला आहे.
शेतकरी कर्ज घेतात आणि त्यानंतर पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहतात. मग कर्जमाफीच्या पैशांचे काय होते? ते लग्नासाठी, साखरपुड्यासाठी वापरतात की शेतीत गुंतवतात? असा वादग्रस्त सवाल कोकाटे यांनी केला. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त करत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे म्हणजे सरकारचा मोठा उपकार नाही, हा जनतेचाच पैसा आहे, कोकाटेंच्या घरचा नाही असा संतप्त सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला

कर्जमाफीचे खोटे आश्वासन
अजित पवार यांनीही यापूर्वी शेतकऱ्यांनी स्वतःचे कर्ज भरावे, असे सांगत वाद ओढवून घेतला होता. त्यावरून सरकारच्या भूमिकेबाबत विरोधकांनी टीका केली. आता कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी करत त्यांच्या संघर्षाचा अपमान केल्याचे सपकाळ यांनी म्हटले. मूठभर उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ करताना सरकारला प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही. मग शेतकऱ्यांना मात्र दरवेळी का टार्गेट केले जाते? असा रोखठोक सवालही त्यांनी केला. कृषीमंत्री कोकाटे यांची याआधीही अनेक वादग्रस्त विधाने चर्चेत आली आहेत.
भिखारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयात विमा देतो, असे बोलत कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अपमान केला होता. सातत्याने शेतकऱ्यांचा अवमान करण्याचा रोग कोकाटेंना जडला असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून करण्यात आली आहे. राज्यात शेतमालाला योग्य भाव नाही, हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. कृषीमंत्री आणि सरकार याकडे कानाडोळा करत आहेत. त्याउलट शेतकऱ्यांनाच वाईटात काढले जात आहे.
महायुतीचे नमुने मंत्री
फडणवीस सरकारमध्ये एक एक मंत्री नमुना आहे, आणि माणिकराव कोकाटे त्यातीलच एक आहेत, अशी उपहासात्मक टीका करत सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांना सत्ता गाजवायची सवय झाली असेल, पण हा सत्तेचा माज शेतकरी नक्कीच उतरवेल, असा थेट इशाराही सपकाळ यांनी दिला आहे. हे प्रकरण आता समोर कोणते नवीन वळण घेणार आणि मुख्यमंत्र्यांकडून काय थोडं पाऊले उचलली जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.