
पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाला शासनाच्या धोरणांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समाजाला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रात पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आता निर्णायक पावले उचलण्याची वेळ आली आहे. शासनाच्या जाचक धोरणांमुळे पारंपरिक मच्छिमारांचे जगणे कठीण झाले आहे. मासेमारी क्षेत्रात ठेकेदार व भांडवलदार शिरल्याने कोळी समाजावर अन्याय वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मच्छिमार समाजाला ठाम पाठिंबा दर्शवून करो वा मरोचा निर्धार व्यक्त केला आहे.
टिळक भवन येथे काँग्रेसच्या मच्छिमार विभागाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सपकाळ यांनी स्पष्ट केले की, कोळी समाजाच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. या संघर्षात पक्ष सर्व ताकदीनिशी सहभागी होईल. मासेमारीसाठी लागणाऱ्या सवलती, नुकसानभरपाई आणि शासनाच्या जीआरचा विरोध या मुद्द्यांवर केंद्रित होत काँग्रेसने लढा पुकारला आहे.

नुकसानभरपाईचा लढा
नवी मुंबई विमानतळामुळे बाधित झालेल्या मच्छिमारांना योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी काँग्रेसकडून शासनावर सातत्याने दबाव आणला जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात ठोस आश्वासन दिले आहे. लवकरच संबंधित खात्यांशी चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सूचित केले. तलाव, धरण, नद्या यामधील मासेमारीवर आलेल्या संकटावरही त्यांनी भाष्य करताना सरकारच्या धोरणांची तीव्र टीका केली.
शासनाने नुकताच काढलेला मासेमारीविषयक जीआर हा पारंपरिक मच्छिमार समाजाच्या विरोधात आहे. त्यातून कोळी समाजाचे नुकसान होत आहे. हा जीआर त्वरित रद्द करावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. सरकारने मासेमारीला कृषीचा दर्जा दिला. असे असले तरी त्यातून प्रत्यक्ष फायदा होत नसल्याचे मत सपकाळ यांनी व्यक्त केले. उलट या घोषणांमुळे कोळी समाज गोंधळात सापडला आहे.
Nagpur Municipal Corporation : अग्निशमन महाविद्यालयाची जमीन मुक्त
ठेकेदारी यंत्रणा
मासेमारीसाठी लागणाऱ्या बोटींच्या डिझेलसाठी सवलत पुन्हा लागू करावी. भांडवलदार व ठेकेदारांमुळे पारंपरिक मच्छिमारांचे नुकसान होत आहे. उत्पन्न आणि खर्च यामध्ये ताळमेळ बसत नाही, हे मुद्दे बैठकीत मांडण्यात आले. भाजपा सरकारने पूर्वी लागू असलेल्या सवलती बंद केल्यामुळे कोळी बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
मच्छिमार समाजासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच संघर्षशील आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या समाजाच्या सन्मान व न्यायासाठी लढण्याचा पुन्हा निर्धार व्यक्त केला. संघटन बळकट करून संघर्षाला सिद्ध राहा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी काळात काँग्रेसचा हा लढा अधिक तीव्र होणार आहे. कोळी समाजाच्या न्यायहक्कांसाठी राज्यभरात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
बैठकीला ॲड गणेश पाटील, मार्तंड नाखवा, रामदास संधे, प्रकाश नगरे, उल्हास वाटकरे, मिल्टन आदी पदाधिकारी उपस्थित होते. मच्छिमार समाजाच्या प्रश्नांची सखोल चर्चा करत ठोस कार्ययोजना ठरविण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आता कोळी समाजाच्या संघर्षाचा आवाज ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.