
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. या पराभवाचा आधार घेत राज्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हटाव मोहिम सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं. त्याचं श्रेय प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना देण्यात आलं. त्यानंतर लगेच पुढं आलेल्या विधानसभा निवडणुकी नाना पटोले हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार बनले. काँग्रेसच्या एका गटानं नाना पटोले यांनाच मुख्यमंत्री करावं लागेल असा आग्रह धरला. मात्र नियतीला हे मंजूर नव्हतं. विधानसभा निवडणुकीत आघाडी पिछाडीवर गेली. आता त्याचं पूर्ण खापर नाना पटोले यांच्यावर फोडलं जात आहे. निवडणुकीनंतर राज्यात पटोले हटाव मोहिम सुरू झाली आहे. या मोहिमेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत पटोले यांच्या विरोधात ‘हाय लेव्हल फिल्डिंग’ लावण्यात आली आहे.
नाना पटोले यांच्या विरोधातील मोहिमेला दिल्लीतूनच खतपाणी घालण्यात येत आहे. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर नाना पटोले हे राहुल गांधी यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक झाले होते. महाराष्ट्राबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असला तरी राहुल गांधी पटोले यांचंच ऐकायचे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपाची बैठक झाली. या बैठकीत नाना पटोले यांची चांगलीच अडवणुकीची भूमिका घेतली होती. त्यामुळं बैठकीत खासदार संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात चांगलीच बाचाबाची देखील झाली. त्यानंतर राऊतांनी पटोले यांची तक्रार केली.

बहिष्कारापर्यंत वाद
पटोले जागा वाटपाच्या बैठकीला येणार असतील तर आम्ही येणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली. त्यामुळं दिल्लीतून रमेश चेन्नीथला यांना मुंबईत यावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठीही नाना पटोले हे अडचणीचे ठरत आहेत. महाविकास आघाडीला बहुमत मिळालं असतं तर काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी नक्कीच नाना पटोले यांचं नाव पुढं केलं गेलं असते. पटोले मुख्यमंत्री होणं शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनाही महागात पडलं असतं. पटोले हे आपलं काहीच चालू देणार नाही, याची पवारांना पूर्ण खात्री होती. त्यामुळं महाविकास आघाडीत खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून पटोले यांना विरोध सुरू झाला.
उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. शरद पवार आणि संजय राऊत यांचीही अशीच ईच्छा होती. त्यासाठी नाना पटोले यांच्या जास्तीत जास्त तक्रारी झाल्या पाहिजे याची काळजी घेण्यात आली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चितीवरूनही पटोले यांच्याशी काँग्रेसच्या एका नेत्याचे मतभेद झालेत. हा मुद्दाही राहुल गांधी यांच्यापर्यंत गेला. यातून साजिद खान पठान यांनाच उमेदवारी मिळाली. साजिद यांनी विजयही मिळविला. मात्र महाविकास आघाडीची नाव पूर्ण पाण्यात घुसली. आता हे ‘टायटॅनिक’ बुडाल्याचं ‘व्हिलन’ पटोले यांना करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातून चौफेर पद्धतशीरपणे फिल्डिंग लावण्यात आली आहे. मात्र राहुल गांधी यासंदर्भात कोणता निर्णय घेतात, याकडं आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.