
शहरातली सकाळ शांत होती, पण सराफा बाजारात एक वादळ शिरलं होतं. झगमगणाऱ्या दारांआड काहीतरी गूढ हालचाल सुरू होती. कोणी सांगत नव्हतं, पण सर्वत्र धडधड सुरू झाली होती.
अकोल्याच्या सराफा बाजारात 14 मे सकाळपासून खळबळ उडाली आहे. सामान्य वाटणाऱ्या या बुधवारच्या सकाळी, अचानक एकापाठोपाठ एक धाडसत्र सुरू झालं आणि अकोल्याचे व्यावसायिक वर्तुळ हादरून गेलं. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या आयकर विभागाच्या विशेष पथकाने अकोल्यातील चार प्रमुख ज्वेलर्स ग्रुपवर धाड टाकली. त्यानंतर तपासणीची मोठी मोहीम सुरू केली आहे. अकोल्यासह अमरावती, यवतमाळ आणि परतवाडा येथेही आयकर विभागाने धाड टाकली आहे.
सकाळी साडेपाच वाजेपासूनच ही धाड मोहीम सुरू आहे. ही कारवाई अकोल्यातील प्रसिद्ध पुनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स, आणि एकता ज्वेलर्स या प्रतिष्ठित दुकानांवर एकाचवेळी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, ही तपासणी फक्त अकोल्यापुरती मर्यादित नाही, तर अमरावती, यवतमाळ, परतवाडा या शहरांतील संबंधित एकूण 17 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले आहेत.

Abhijit Wanjarri : मराठी शिक्षणाचा मूलभूत हक्क अबाधित ठेवावा
भीती अन् उत्सुकता एकत्र
तपासासाठी आलेल्या पथकाने कडक गोपनीयता राखलेली असून, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र या धाडीच्या बातम्यांमुळे अकोल्यात सोन्याच्या बाजारात भीतीचे आणि उत्सुकतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक पोलिस बंदोबस्तात ही मोहीम पार पडत असून शहरात जोरदार चर्चा सुरू आहे की, नेमकं इतक्या मोठ्या प्रमाणावर ही कारवाई का करण्यात आली?
प्राप्त माहितीनुसार, ही तपासणी अचानक घडलेली नसून, ती मागील वर्षीच्या एका मोठ्या प्रकरणाचा पुढचा टप्पा आहे. 15 मे 2024 रोजी नांदेडमध्ये आयकर विभागाने एक भव्य कारवाई केली होती. ज्यामध्ये अनेक आर्थिक अनियमितता उघड झाल्या. या कारवाईदरम्यान सापडलेले काही आर्थिक धागेदोरे थेट अकोल्यापर्यंत पोहोचत होते.
Abhijit Wanjarri : BBA, BCA आदी अभ्यासक्रमांसाठी सकारात्मक वळण
अनेक ठिकाणी छापे
या धाडसत्राचं स्वरूप केवळ अकोल्यापुरतं सीमित नव्हतं. अमरावती, यवतमाळ आणि परतवाडा या शहरांतील संबंधित शाखांवर आणि प्रतिष्ठानांवर देखील आयकर विभागाने एकाचवेळी कारवाई केली. एकूण 17 ठिकाणी समांतर छापे टाकण्यात आले आहेत. या ठिकाणी संबंधित व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे. या बहुपरिमाणीत धाडीतून विभागाच्या कारवाईचा व्यापक आणि पूर्वनियोजित स्वरूप अधोरेखित होतो.
त्याच अनुषंगाने, आयकर विभागाने यावेळी अकोल्यातील कोठडी बाजारातील ‘अशोकराज आंगडिया कुरियर सर्व्हिस’वरही धाड टाकली. संशय होता की, या कुरियर सेवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार केले गेले होते, जे नांदेड प्रकरणाशी थेट संबंधित आहेत. त्यामुळेच तपास अधिक खोलात नेण्यासाठी ही धाड टाकण्यात आली.
पूर्वीही झाली होती छापेमारी
हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. मागील वर्षी मे महिन्यातही आयकर विभागाने अकोल्यात धाड टाकली होती. नांदेड प्रकरणातील सुरागांनंतर आयकर विभागाने आपला मोर्चा अकोल्याकडे वळवला होता. तेव्हा नागपूर येथील आयकर अधिकाऱ्यांनी अकोल्यातील आंगडिया सर्व्हिस एजन्सी व इतर दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापे टाकून महत्वाची माहिती गोळा केली होती.
सध्या सुरू असलेल्या कारवाईत नेमकं काय मिळालं? कोणते दस्तऐवज किंवा व्यवहार उघड झालेत? याबाबत प्रशासन अजूनही मौन बाळगून आहे. मात्र, स्थानिक व्यापार वर्तुळात खळबळ उडाली आहे. या तपासणीनंतर आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून, अन्य व्यावसायिकही आयकर विभागाच्या या ‘अनपेक्षित वज्राघातामुळे’ सावरत आहेत. अकोल्यातील आर्थिक वर्तुळातील ही घडामोड केवळ स्थानिकच नाही, तर संपूर्ण विदर्भातील व्यापारी जगतातील एका मोठ्या हालचालीचे संकेत देणारी मानली जात आहे.