महाराष्ट्र

Maharashtra : सरकारी नोकरीत भत्त्यांचा वसंत 

Dearness Allowance : वेतनवाढीचा दिवाळी तोफ 

Author

खिशात सुखाचे थेंब पडण्याची तयारी सुरू झाली आहे. जुलैपासून महागाई भत्त्याच्या वाढीचा सुगंध दरवळायला लागणार आहे.

सरकारी नोकरीत कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी आणि उत्साह वाढवणारी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे. लवकरच देशभरातील सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नव्या वेतनमानाचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही चांगली बातमी आहे. त्यांचा महागाई भत्ता (DA) देखील लवकरच वाढणार आहे.

केंद्र सरकारने 2025 वर्षाच्या सुरुवातीलाच आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली आहे. संबंधित आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या सुमारे एक कोटी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना थेट फायदा होणार आहे. याअंतर्गत वेतन वाढ, भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे.

कर्मचाऱ्यांसाठी डीएमध्ये वाढ 

राज्य शासनाकडून देखील कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा लवकरच अपेक्षित आहे. सध्या 53 टक्के असलेला महागाई भत्ता वाढवून 55 टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. ही वाढ केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात येणार असून, 1 जानेवारी 2025 पासून ती प्रभावी ठरणार आहे.

महत्वाचे म्हणजे, काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा DA देखील वाढवून 55 टक्के करण्यात आला आहे. सामान्यतः जेव्हा अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा भत्ता वाढतो, त्यानंतर काही आठवड्यांत राज्य कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळतो. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या जुलै 2025 मधील पहिल्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकदा निर्णय झाल्यानंतर शासन निर्णय जारी केला जाईल.

महागाई भत्ता

राज्य कर्मचाऱ्यांसोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुलै 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढून 58 टक्के होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वर्षी जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यांमध्ये DA मध्ये सुधारणा केली जाते. जानेवारी 2025 पासूनचा DA आधीच लागू झाला आहे, आता जुलै महिन्यापासूनचा DA वाढ लवकरच निश्चित होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दिवाळीच्या सुमारास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

DA वाढीचा निर्णय हा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक (AICPI) यावर आधारित असतो. जानेवारी ते जून 2025 या कालावधीतील निर्देशांकाच्या आधारे जुलैपासून किती टक्क्यांनी DA वाढेल हे ठरणार आहे. सध्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचे निर्देशांक समोर आले आहेत. उर्वरित एप्रिल, मे आणि जून यांचे आकडे येत्या काळात जाहीर होतील आणि त्यानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल.

सुवर्णसंधीचा काळ

एकीकडे नवीन वेतन आयोगाच्या घोषणेमुळे भविष्यकालीन वेतन वाढीची वाटचाल सुरु झाली आहे, तर दुसरीकडे सध्याच्या आर्थिक ताणतणावात DA वाढ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. राज्य आणि केंद्रातील दोन्ही कर्मचाऱ्यांना येत्या काही महिन्यांत अधिक वेतन, अधिक भत्ते आणि आर्थिक स्थैर्य याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारी नोकरीतील लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही वेळ केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर मानसिकदृष्ट्याही समाधान देणारी ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!