
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने हवाई हल्ला केला. पण भारतीय सैन्याने त्याला परतवून, पाकिस्तानच्या प्रमुख शहरांना लक्ष्य करत निर्णायक प्रत्युत्तर दिले. काँग्रेसकडून भारतीय सैन्याच्या कार्यकुशलतेचं कौतुक.
ऑपरेशन सिंदुरनंतर कोपलेल्या पाकिस्तानने आठ एप्रिल रोजी रात्री सूड उगवण्याच्या प्रयत्नात भारतावर हवाई हल्ला चढवला. मात्र, हा प्रयत्न भारतीय सैन्याच्या भक्कम प्रत्युत्तरामुळे पूर्णपणे फसला. केवळ हल्ला परतवून लावण्यातच नव्हे, तर पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या प्रमुख शहरांवर प्रचंड हल्ला केला गेला. भारतीय हवाई दल आणि नौदलाने संयमाच्या मर्यादा संपल्यावर आक्रमक रणनीती आखत पाकिस्तानची कंबर मोडली. प्रतिहल्ल्यात भारतीय वायुदलाने आधुनिक क्षेपणास्त्र आणि स्वार्म ड्रोन्सच्या साहाय्याने इस्लामाबाद, लाहोर, क्वेटा या शहरांना लक्ष्य करत धडाकेबाज कारवाई केली.
रात्रीच्या काळोखात पाकिस्तानच्या शहरांमध्ये स्फोटांच्या मालिकेमुळे भीतीचं सावट पसरलं. कराची बंदरावर भारतीय नौदलाने आयएनएस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवला. युद्धनौकांमधून डागलेल्या क्षेपणास्त्रांनी कराचीत अक्षरशः 14 मोठे स्फोट घडवले. स्फोटांमुळे बंदरावरील महत्त्वाची यंत्रणा आणि गोदामं बेचिराख झाली आहेत. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेलं कराची बंदर पूर्णपणे ठप्प झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भारतीय लष्कराने या हल्ल्याचे फुटेजही जारी केले आहे. फुटेजमध्ये पाकिस्तानचा स्वार्म ड्रोन भारतीय सीमेत शिरताना दाखवला आहे.

काँग्रेसने दिला पाठिंबा
भारतीय लष्कराने याच ड्रोनला क्षणात पाडल्याचं दृश्यमान होत आहे. सीमारेषेवर पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना भारतीय पायदळही सज्ज आहे. राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने एकत्र येऊन पाकिस्तानविरोधात पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी भारतीय सेनेच्या कारवाईचे जोरदार कौतुक केले. आठ एप्रिल रोजी रात्री पाकिस्तानने सीमेलगतच्या भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने तो हल्ला निष्फळ ठरवत पाकिस्तानची राळ उडवली, असं म्हणत त्यांनी ‘विकराल काल मुँह खोलेगा, दुर्योधन! रण ऐसा होगा, फिर कभी नहीं जैसा होगा!’ या महाभारतातील काव्यपंक्तींचा उद्धार करत देशभक्तीचा झंझावात उठवला.
भारतीय सैन्यदलाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भारतीय लष्कराने जे पराक्रम केले, त्यातून भारताची सुरक्षा, शौर्य आणि संयम स्पष्टपणे दिसून आला आहे. असंही ते म्हणाले. काँग्रेसने यापूर्वीच पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरला काँग्रेसनेही आता पाठिंबा दर्शवला आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन भारतीय सेनेच्या बाजूने सर्व पक्ष आता एकवटले आहेत, हे या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत आहे.