भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, आता सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर जाऊन भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणार आहे.
भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देताना पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आता भारत सरकार त्या कारवाईमागील भूमिका आणि पाकिस्तानच्या दहशतवाद पोसणाऱ्या धोरणांविरोधात ठाम मत मांडण्यासाठी जगाच्या पटलावर उतरते आहे. यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांचे निवडक शिष्टमंडळ तयार केले आहेत. हे शिष्टमंडळ 22 मे पासून 10 दिवसांच्या दौऱ्यावर 5 ते 8 आघाडीच्या देशांना भेट देणार आहे. त्यांच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या भेटीत ऑपरेशन सिंदूरमधील भारताची भूमिका मांडली जाणार आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह जागतिक मंचांवर भारत पाकिस्तानविरोधी पुरावे सादर करणार आहे.या दौऱ्यासाठी 7 प्रमुख शिष्टमंडळ स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात 5 खासदार असतील. संसदीय कामकाज मंत्रालयाने घोषित केलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, द्रमुकच्या कनिमोझी, जेडीयूचे संजय कुमार झा, राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) सुप्रिया सुळे आणि शिवसेना (शिंदे गट) श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय, काँग्रेसकडून जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार या चार खासदारांची नावेही पाठवण्यात आली आहेत.
देशाची शांतता कटिबद्धता
प्रत्येक पथक विशिष्ट देशांना भेट देईल आणि भारताच्या कारवाईमागील रणनीती स्पष्ट करेल.हे शिष्टमंडळ मुख्यत्वे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमधील स्थायी आणि अस्थायी सदस्य देशांना भेट देणार आहे. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरोधात भारताने घेतलेली कारवाई, त्यामागची माहिती, पुरावे आणि भारताची शांततेबाबतची कटिबद्धता या देशांपुढे मांडली जाणार आहे.माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ओडिशातील भाजप खासदार अपराजिता सारंगी, तसेच असदुद्दीन ओवैसी, सुदीप बन्योपाध्याय (टीएमसी), सस्मित पात्रा (बीजेडी) आणि जॉन ब्रिटास (CPI-M) यांची नावेही या शिष्टमंडळासाठी चर्चेत आहेत.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला. त्यानंतर भारताने 7 मे रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले करत 9 दहशतवादी तळ नष्ट केले. अंदाजे 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. 10 मे रोजी संध्याकाळी दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आता जागतिक व्यासपीठावर अधिक आक्रमकतेने आणि स्पष्टपणे आपला मुद्दा मांडणार आहे. राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले, आपल्या देशाचा प्रश्न असला की सर्व पक्ष एकत्र उभे राहतात हीच आपली ताकद आहे.
Police Transfer : नागपूरच्या सुरक्षा रणभूमीत तीन अधीक्षकांचे आगमन
