महाराष्ट्र

Buldhana : जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय

ZP Schools : शाळा वाचवण्यासाठी आर्थिक मदतीची शिडी

Author

सुटाळा खुर्द ग्रामपंचायतीने गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टीत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द ग्रामपंचायतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवून ग्रामीण शिक्षणाच्या क्षेत्रात सकारात्मक वळण दिले आहे. जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास टिकवून ठेवत शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीने थेट पालकांच्या खिशाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास त्यांच्या पालकांना 2025 – 26 या चालू वर्षातील घरपट्टीमध्ये थेट 50 टक्के सवलत मिळणार आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास हातभार लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाने इतर गावांसाठीही आदर्श तयार केला आहे.

चेहरामोहरा बदलवणारे प्रयत्न

सुटाळा खुर्द ग्रामपंचायत ही नेहमीच लोकहितार्थ व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी पंचायत म्हणून ओळखली जाते. मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतीने शाळेचे रूप पालटण्याचा ध्यास घेतला आहे. यामध्ये शाळेसाठी प्रोजेक्टर, आरओ प्रणाली, खेळासाठी साहित्य आणि शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉकसारखी सुविधा पुरवण्यात आली. रंगरंगोटी करून शाळेचे संपूर्ण रूपच बदलण्यात आले आहे. या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली आहे. गावातील नागरिकांची शाळेवरील विश्वासार्हता वाढली आहे. आता ग्रामपंचायतीच्या नव्या निर्णयामुळे या कामगिरीला नवे बळ मिळाले आहे.

सुटाळा खुर्द ग्रामपंचायतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मासिक सभेत महत्त्वाचा ठराव केला. ठरावानुसार, शाळेतील प्रवेश वाढवण्यासाठी गावातील पालकांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले. त्यानुसार, ज्या पालकांनी आपल्या मुलांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश केला आहे, त्यांना चालू आर्थिक वर्षातील घरपट्टीमध्ये थेट 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. सरपंच निलेश विनायकराव देशमुख, सचिव आर. जे. कांबळे, उपसरपंच व सदस्यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेतला गेला. यासाठी आवश्यक नियोजन, बजेट व लोकसहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

आर्थिक सवलतीचा मार्ग

शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत घटत असल्याचे चित्र आहे. खाजगी शाळांमुळे स्पर्धा वाढली आहे. ग्रामीण भागातील सरकारी शाळा टिकवण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे. सुटाळा खुर्द ग्रामपंचायतीचा हा निर्णय या पार्श्वभूमीवर योग्य दिशेने टाकलेले पाऊल मानले जात आहे. घरपट्टी सवलतीचा थेट लाभ पालकांना होणार असल्याने, ते आपल्या मुलांना स्थानिक जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्यास प्रेरित होतील. यामुळे गावातील सरकारी शाळेची वाढती संख्या व शैक्षणिक गुणवत्ता टिकवणे शक्य होईल.

गाव पातळीवर शालेय शिक्षण टिकवण्यासाठी सुटाळा खुर्द ग्रामपंचायतने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढून शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल. शिक्षणाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा ध्यास यामागे आहे. शासनाकडून जिल्हा परिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याला लोकसहभागाची जोड मिळाल्यासच यश मिळू शकते. सुटाळा खुर्द ग्रामपंचायतने दाखवलेला मार्ग इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.

शैक्षणिक बदलासाठी प्रशासनाच्या पुढे गावकरीही पाऊल टाकत असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. सुटाळा खुर्द ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावकऱ्यांची जिल्हा परिषद शाळेतील सहभागिता वाढेल. त्यातून शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होईल आणि मुलांना त्यांच्या गावातच चांगले शिक्षण घेण्याची संधी मिळेल. शाळा वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय हा परिवर्तनाच्या दिशेने एक मजबूत टप्पा ठरणार आहे. सुटाळा खुर्दच्या पावलावर पाऊल टाकत इतर गावांनीही अशाच लोकोपयोगी निर्णयांची वाट चालावी, हीच वेळेची गरज आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!