महाराष्ट्र

Anjali Ambedkar : राजकारण, चळवळ अन् प्रेमाचा प्रवास 

Women's Day : आंबेडकर दांपत्याची प्रेरणादायी कहाणी 

Share:

Author

महिला दिनाच्या निमित्ताने, अनेक सशक्त महिलांच्या प्रेरणादायी कथा समोर येतात. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची पत्नी प्रा. अंजली आंबेडकर यांची वाटचाल आणि सामाजिक लढा प्रेरणादायी ठरतो.

प्रकाश आणि अंजली आंबेडकर हे बहुजन चळवळीतील मोठं नाव. शोषित घटकांना न्याय देण्यासाठी त्यांचा आवाज नेहमीच बुलंद असतो. मनुवाद आणि घराणेशाहीला त्यांचा कडवा विरोध. समाता, बंधुता, एकात्मता यावर गाढा विश्वास. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यात त्यांना प्रचंड पाठबळ मिळालं ते अंजली आंबेडकर यांचं. अंजली आंबेडकर जळगावमध्ये नोकरीला होत्या. प्रकाश आंबेडकर नावाचं वादळ त्याही वेळी महाराष्ट्रात क्रांतीची लहर निर्माण करीत होतं. प्रकाश आंबेडकर यांना भेटणं सहज शक्य होत नव्हतं. त्याला कारण म्हणजे बहुजन चळवळ उभी करण्यासाठी ते दिवसरात्र राबत होते. अशातच अंजलीताई आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. दोघंही विवाहबद्ध झालेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अंजली आंबेडकर यांनी तितक्याच ताकदीनं प्रकाश आंबेडकर यांना साद आणि साथ दिली.

प्रकाश आंबेडकर यांच्या आयुष्यात अंजली आंबेडकर आल्या. त्यानंतर त्यांच्या कार्याला आणखी मजबुती मिळाली. जीवनसाथी म्हणून अंजली आंबेडकर यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आपला आवाज बुलंद केला. चुकीच्या प्रथांवर प्रहार केला. अन्यायाला वाचा फोडली. विनाकारण जातीभेद करणाऱ्यांना विरोध केला. जातीभेद न पाळता सच्च्या कार्यकर्त्यांना जवळ केलं. आंबेडकरी चळवळीत अंजली आंबेडकर यांनी स्वत:ला झोकून दिलं. भारिप बहुजन महासंघ आणि आताच्या वंचित बहुजन आघाडीत अंजली आंबेडकर यांचं योगदानही तितकंच मोलाचं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी विवाह केल्यानंतर मलाही आंबेडकरी चळवळीचा भाग होता आलं. याचं फार समाधान वाटतो. आनंद आहे, असं त्या सांगतात.

Nitin Gadkari : गडकरींच्या जीवनाला मिळाले नव’कांचन’ 

महिला हक्कासाठी लढा

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत महिलांचा सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून फुले, शाहू, आंबेडकरांनी मोठा लढा दिला. त्यांचाच वारसा प्रकाश आंबेडकर चालवित आहेत. हाच लढा अंजली आंबेडकर यांनी धारदार केला. प्रत्येक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी मिळावी यासाठी त्या आग्रही असतात. प्रकाश आंबडेकर हे स्वत: विधी क्षेत्राचे जाणकार. अंजली आंबेडकर या प्राध्यापक. त्यामुळं या उच्च विद्याविभूषित दाम्पत्यानं आजपर्यंत महाराष्ट्रातील बहुजनांसाठी व्यापक असा लढा उभारला. अंजली आंबेडकर यांच्या साथीनं प्रकाश आंबेडकर यांना बहुजन समाजासाठी मोठा टप्पा गाठता आला.

महिलांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यासाठी अंजली आंबेडकर नेहमीच प्रोत्साहित करीत असतात. प्रकाश आणि अंजली आंबेडकर यांच्या विचारांमुळंच वंचित बहुजन आघाडीचं प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना करण्यात आलं. नारीशक्तीचा हा अनोखा सन्मानच म्हणावा लागेल. मध्यंतरीच्या काळात प्रकाश आंबेडकर यांनी प्रकृतीच्या कारणानं विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी पक्षाची धुरा रेखा ठाकूर यांच्याकडं सोपविली. घराणेशाही करीत कुटुंबातील कोणालाही पुढं केलं नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या या आदर्श निर्णयाला अंजली आंबेडकर यांनी पाठबळच दिलं. तसं पाहिलं तर प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांना आपलं संपूर्ण आयुष्य अगदी आरामात जगता आलं असतं. पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या स्वप्नातील भारत घडला पाहिजे, या हेतूनं या जोडीनं आपलं आयुष्य बहुजन समाजासाठी वेचलं. प्रकाश आंबेडकर यांचं कार्य जितकं व्यापक आणि सन्मानजनक आहे, तितकंच मोठं योगदान अंजली आंबेडकर यांचंही या चळवळीत नक्कीच आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!