
विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी राज्य सरकारला अनेक गोष्टींवरून धारेवर धरले होते. आता सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्यानंतर राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे काम विरोध करत आहेत.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चाकुने हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील त्यांच्या घरात ही घटना 16 जानेवारी गुरूवारी पहाटे घडली आहे. या घटनेनंतर मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आधीपासूनच टीकेच्या चौकटीत असलेल्या राज्य सरकारवर या घटनेमुळे विरोधकांकडून आणखी जोरदार टीका होत आहे. या घटनेची जाब राज्य सरकारला विचारण्यात येत आहे. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एक हल्ला घडला म्हणून मुंबई शहराला असुरक्षित म्हणणे अतिशय चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.
मुंबईतील बांद्रा येथे सैफ अली खान यांच्या राहते घरातच त्यांच्यावर हल्ला झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी देखील भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी केजरीवाल यांनी महाराष्ट्र राज्यातील सरकार आणि केंद्र सरकारवर सुद्धा निशाणा साधला आहे.

फडणवीस यांनी सांगितलं काय ते..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत म्हणाले की, मुंबई देशातील सर्वात जास्त सुरक्षित मेगा सिटी आहे. देशातील सर्व मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे, असे आपल्याला वाटत असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. कधी कधी काही घटना घडतातच, हे खरं आहे. त्यांना गंभीरतेने घेणं देखील महत्त्वाचा आहे. परंतु फक्त अशा काही घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. मुंबईला असुरक्षित म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण यामुळे मुंबईची प्रतिमा खराब होऊ शकते. पण मुंबई शहर अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे, याकरिता सरकार नक्कीच प्रयत्न करणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर 16 जानेवारी रोजी त्यांच्या राहत्या घरी चाकुने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला आहेत. सैफ अली खान यांच्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार हल्ला करणारा व्यक्ती चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता. त्या चोराला अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या व्यक्तीने सैफ अली खानवर हल्ला चढविला. या घटनेत सैफ अली खान यांच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. त्यानंतर सैफ अली खानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त होत आहे. दरम्यान या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोपांच्या फैरी लावल्या आहेत.