
भंडारा जिल्ह्यातील पालांदूर गावाला अजूनही पाण्यासाठी झगडावं लागतंय. 2023 पासून सुरू झालेली कोट्यवधींची जलजीवन योजना आजही अपूर्ण अवस्थेत अडकलेली आहे.
उन्हाच्या झळा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालल्या आहेत. विशेषतः विदर्भात उकाड्याचा कहर वाढत आहे. या उष्णतेचा सर्वात मोठा फटका बसतोय तो सर्वसामान्य नागरिकांना. जलस्तर आटत चालला असून अनेक ठिकाणी तलाव कोरडे पडलेत. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी मोठी झगड करावी लागतेय. याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील पालांदूर गावातही पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाच्या हर घर जल, घर घर नल या गाजलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत येथे जवळपास दोन कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. तरी प्रत्यक्षात अजूनही गावकऱ्यांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. वर्ष 2023 पासून सुरु झालेल्या या योजनेत 1 कोटी 97 लाख रुपये खर्च करून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कामाची जबाबदारी अरविंद कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे दिली गेली, पण कामाचा ठोस पुरावा गावकऱ्यांना अद्यापही दिसलेला नाही.

Shivdeep Lande : बिहारींना हात लावला तर परिणाम भोगावाच लागेल
कंत्राटदार गायब
गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी या कंत्राटदाराला काम करताना कधी पाहिलंच नाही. ही खंत अनेक बैठकींमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि कंत्राटदारांच्या अनास्थेमुळे ही योजना आजही अधांतरी अवस्थेत आहे. डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, अशी ग्वाही अभियंत्यांनी दिली होती. पाणी अजूनही नळांमध्ये नाही आणि गावकऱ्यांची भटकंती सुरूच आहे. पालांदूरच्या पाण्याचा संघर्ष नवा नाही.
1971 पासून आजवर चार वेळा पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या आहेत. कधी खराशी नाल्यावरून, तर कधी पाथरी नाल्यावरून. 2007 मध्ये तब्बल 1 कोटी 25 लाख रुपये खर्चून सुद्धा पाणीप्रश्न पूर्णपणे सुटला नाही. आता जलजीवन ही पाचवी योजना पण त्याच रेंगाळलेल्या नियोजनात अडकलेली. ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी सांगितले की, या कामावर कोणतीही जबाबदारी घेणारा सापडत नाही. आम्ही समस्या कुणाकडे मांडावी, हाच मोठा प्रश्न आहे.
पाणीटंचाईच्या सगळ्याच्या मुळाशी आहे, तो राजकारणाचा सावट. आश्वासनं अनेक मिळाली, पण अंमलबजावणीच्या बाबतीत नेहमीच तुटवडा. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही श्रेयवाद आणि घोषणाबाजी यापलीकडे काहीच केलं नाही. पाण्याच्या नावावर अनेक राजकीय कारकिर्दी घडल्या, पण पाण्याचा एक थेंबही गावाच्या प्रत्येक घरी पोहोचला नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.