
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
सोमय्या यांनी अकोला, नागपूर आणि यवतमाळमध्ये महसूल विभागाच्या बैठका घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर बांगलादेशी नागरिकांना भारतीय जन्म प्रमाणपत्र मिळवून देऊन निवडणुकीत राजकीय फायदा घेतल्याचा आरोप केला.
किरीट सोमय्या यांनी दावा केला की, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना बांगलादेशी नागरिकांच्या जन्म प्रमाणपत्रांच्या घोटाळ्यामुळे राजकीय फायदा झाला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररीत्या जन्म प्रमाणपत्रे दिली गेली आहेत.

प्रलंबित प्रकरणे स्थगित, चौकशीची मागणी
किरीट सोमय्या यांनी सांगितले की, महसूल विभागाने गेल्या वर्षभरात बेकायदेशीररीत्या जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा अहवाल आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. तसंच, सध्या या प्रलंबित प्रकरणांची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
या आरोपांवर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनीही प्रतिक्रिया देत, ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. त्यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. मात्र, किरीट सोमय्या यांनी साजिद खान पठाण यांना तोंडी आरोप न करता लेखी स्वरूपात आपली भूमिका मांडण्याचे आव्हान दिले आहे.
अकोल्यातील राजकीय वातावरण तणावपूर्ण
या प्रकरणामुळे अकोल्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महसूल विभागाच्या कामकाजावरही संशयाची सुई फिरत आहे.
किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि बांगलादेशी नागरिकांना मिळालेल्या बेकायदेशीर प्रमाणपत्रांचा तपास करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
अकोल्यातील हा जन्म प्रमाणपत्र घोटाळा महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये तणाव वाढला आहे. पुढील तपासणीत काय निष्कर्ष निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.