
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांकडून मिळालेल्या बनावट जन्मप्रमाणपत्रांवरून अमरावतीत तहसीलदारांवर फौजदारी कारवाईची मागणी केली.
भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिका घेणारे किरीट सोमय्या यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या खोट्या जन्मप्रमाणपत्रांवरून मोठा वाद उभा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशभरात या घुसखोरीच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले आहे. परंतु महाराष्ट्रात विशेषतः अमरावती जिल्ह्यात हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर पोहोचले आहे. सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार, काही रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांनी बनावट माहितीच्या आधारे भारतीय अधिकृत जन्म प्रमाणपत्रं मिळवली आहेत. हे फक्त बनावट कागदपत्रांचं प्रकरण नसून, त्यामागे एक संगठित रॅकेट कार्यरत असल्याचंही ते सूचित करतात.
किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांना भेटी देत संबंधित अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईची मागणी केली. त्यांचा आरोप आहे की, संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हे बनावट जन्मप्रमाणपत्रं जारी झाली. पण सोमय्यांच्या या सातत्यपूर्ण दबावामुळे आता प्रशासकीय यंत्रणा संतप्त झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील तहसीलदार संघटनेने सोमय्यांवर गंभीर आरोप करत थेट बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोमय्या तहसील कार्यालयात येऊन अधिकार्यांना धमकी देतात अर्जदारावर कारवाई करा, नाहीतर तुमच्यावर गुन्हा दाखल करू.

Nagpur : पाण्याचे तांडव थांबविण्यासाठी अंबाझरीचं कवच अधिक मजबूत
प्रशासनावर कारवाईचा दबाव
गेल्या सहा महिन्यांत त्यांनी अमरावती जिल्ह्यात तब्बल सहा पेक्षा जास्त वेळा दौरे केले आहेत. प्रत्येक वेळी त्यांचे लक्ष्य जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालये आणि तेथील प्रशासकीय यंत्रणा असते. त्यांचा असा आरोप आहे की ही यंत्रणा जाणूनबुजून डोळेझाक करते आणि अशा घुसखोरांना बनावट ओळखी उपलब्ध करून देतात जे देशाच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकते. सोमय्यांच्या या कारवाईला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून काही ठिकाणी पाठिंबा मिळत असला तरी, प्रशासकीय यंत्रणा मात्र त्यांचा निषेध करत आहे. अमरावती जिल्ह्याचे तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, यापुढे किरीट सोमय्या यांच्या बैठकीस कोणताही तहसीलदार उपस्थित राहणार नाही.
यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. ज्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांना बनावट आधार कार्ड आणि इतर खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय जन्म प्रमाणपत्रं देण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात थेट तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अनियमिततेचा संदर्भ देणारे गंभीर पुरावे पुढे आले होते. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचा तपास स्वतः करून हा मुद्दा प्रकाशात आणला होता. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला असून, नागपूरमध्ये दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतचे तथ्य समाजासमोर मांडले.
सोमय्या यांच्या मते, अचलपूरमधील प्रकार ही केवळ सुरुवात आहे. यामागे एका मोठ्या बनावट दस्तऐवज रॅकेटचे संचलन असण्याची शक्यता आहे. त्यांनी हे प्रकरण केवळ स्थानिक नव्हे, तर राज्यस्तरावरही गंभीरपणे तपासण्याची मागणी केली आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंता वाढली असून, प्रशासनाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.