
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बनावट बांगलादेशी आणि रोहिंग्या प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस येत आहे. या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने प्रयत्नशील राहून घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारा आणि बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या माध्यमातून होणाऱ्या घुसखोरीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे धारदार शस्त्र म्हणून ओळखले जाणारे किरीट सोमय्या यांनी यावर थेट हल्ला चढवला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या बनावट कागदपत्रांवरून देशभरात मोठा गदारोळ सुरू आहे. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात याचे पडसाद तीव्रतेने उमटू लागले आहेत. सोमय्या हे मागील काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी या विषयावर सातत्याने आवाज उठवला आहे.

शुक्रवारी (27 जून रोजी) अकोला महापालिकेच्या दौऱ्यावर असताना किरीट सोमय्यांनी थेट मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितले की, अकोला महापालिका क्षेत्रातील उप तहसीलदारांनी दिलेल्या 2 हजार 200 जन्म प्रमाणपत्रांची रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार झालेले पासपोर्ट आणि व्हिसाही आता रद्द होणार आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, आतापर्यंत 82 बनावट प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहे. अजून तब्बल एक हजार लोकांशी थेट संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
विलंबामुळे वाढती चिंता
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अकोल्यातील सरकारी सर्वोपचार रुग्णालयाने कोणत्याही कायदेशीर अधिकारांशिवाय तब्बल 1 हजार 600 प्रमाणपत्रे कशी काय जारी केली? याबाबत सोमय्यांनी थेट चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनाला थेट जाब विचारत विलंब न करता कारवाई करण्याचा इशारा दिला. या प्रकरणातील विलंबामुळे ज्या लोकांनी फसव्या कागदपत्रांच्या आधारे परदेशात पलायन केले आहे.
त्यांच्यावर देखील सरकारी यंत्रणांची नजर आहे. त्या लोकांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रक्रियेला अजून गती देताना सोमय्यांनी सांगितले की, येत्या दहा दिवसांत आणखी दोन हजार बनावट जन्म प्रमाणपत्रे रद्द केली जातील.
Amravati : व्यसनाच्या विळख्यातले चेहरे पोलिसांच्या ‘हिट लिस्ट’वर
महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त गीता ठाकरे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. सोमय्या म्हणाले, जर या बनावट घुसखोरीवर आता ठोस पावले उचलली नाहीत, तर देशाच्या नागरिकत्वाचाच गंभीर प्रश्न उभा राहील. त्यामुळे त्यांनी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला कठोर आणि निष्क्रीय नसलेल्या कारवाईचे आवाहन केले.
सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट केले की, फसवे कागदपत्र तयार करणाऱ्यांविरोधात व्यापक तपास होऊन, त्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत. केवळ अकोलाच नव्हे, तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांत देखील हे जाळे पसरलेले असल्याचे ते म्हणाले. हा केवळ घोटाळा नाही, तर देशाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे, असे सांगत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.