
वर्ध्यात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसलेल्या किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने बेकायदेशीर कृत्याचा आरोप केला.
भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचाराविरोधात सतत आवाज उठवणारे किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी पाहायला मिळत आहे. देशभरात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांवरून मोठा राजकीय गदारोळ माजवणारे सोमय्या सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्या या मोहीमेला वर्धा जिल्ह्यात अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे.सोमय्या यांनी सोमवारी (16 जून) वर्ध्याचा दौरा केला. जिल्हाधिकारी कार्यालयात ते गेले आणि तेथील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात काही वेळ थांबले. यावेळी घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि नवा राजकीय वाद उफाळून आला.
फोटोमध्ये सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसलेले दिसत आहे. यामुळे विरोधकांच्या टीकास्त्रांना स्फोटक चकमक मिळाली आहे.काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी किरीट सोमय्यांच्या वर्धा दौऱ्यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसण्याच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, हा बिनपगारी ‘फुल अधिकारी’ कोणी नेमला? किरीट सोमय्या कोणत्या अधिकाराने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन खुर्चीत बसले. कोणता अधिकार गाजवतो? सरकारने त्यांना काही विशेष अधिकार दिले आहेत का? अधिकार नसतील, तर हे ‘सोमय्या’ नावाचे सत्ताबाह्य केंद्र तत्काळ उखडून टाका आणि या बेकायदेशीर कृत्यावर गुन्हा दाखल करा, असा घणाघात त्यांनी केला.

नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह
घटनेवर इतर विरोधकांनीही प्रतिक्रिया देताना भाजपच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले. अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि लोकशाही संस्थांचा अपमान झाल्याचा आरोप लावला.परंतु भाजपकडूनही लगेच प्रतिक्रिया देण्यात आली. भाजप नेते श्रीधर देशमुख यांनी स्पष्ट केलं की, त्या वेळी उपजिल्हाधिकारी उपस्थित नव्हते. सोमय्या यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चेसाठी जागा घेतली होती. फोटो पाहिल्यास काहीही चुकीचं आढळत नाही, असा दावा त्यांनी केला. वादाच्या पार्श्वभूमीवर मुद्दा खुर्चीवरून वळून मूळ विषयाकडे म्हणजे रोहिंग्या घुसखोरांच्या प्रश्नाकडे वळला. सोमय्या यांनी जिल्हाधिकारी वॉन्मथी सी. यांची अधिकृत भेट घेतली आणि वर्ध्यातील रोहिंग्या समस्येवर आपली भूमिका स्पष्ट केली.
सोमय्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, वर्धा जिल्ह्यात सुमारे 800 अनधिकृत रोहिंग्या नागरिक वास्तव्य करत आहे. या नागरिकांना जन्म प्रमाणपत्रं, रेशन कार्ड आणि अगदी मतदार यादीतही नावं मिळालेली आहे. या प्रकारामुळे नागरिकत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे एका खुर्चीवरून सुरू झालेला वाद आता राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर विषय बनत चालला आहे. सोमय्यांचा वर्ध्यातील दौरा, वादग्रस्त बैठक आणि त्यानंतरचा राजकीय भडका यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे.