
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या टिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी त्याच्या विनोदाचा रोख महाराष्ट्राच्या राजकारणावर, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होता. कामराने आपल्या स्टाईलमध्ये विडंबनात्मक गाणं सादर केलं, ज्यात अप्रत्यक्षरित्या शिंदे यांना ‘गद्दार’ म्हणून संबोधलं. मात्र, हा विनोद काही जणांच्या पचनी पडला नाही. शिंदे गटाचे कार्यकर्ते या गाण्याने संतप्त झाले आहेत.
कुणाल कामरा याने केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपली वेगवेगळी प्रतिक्रिया उमटवली आहे. मात्र संजय राऊत यांनी कुणाल कामराचे समर्थन केलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही यावर जोरदार प्रतिउत्तर दिलेले आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी ‘द युनिकॉन्टीनेंटल हॉटेल’मध्ये घुसून जोरदार तोडफोड केली, कारण याच हॉटेलमध्ये कामराचा स्टुडिओ होता. इतकंच नव्हे, तर त्याच्या शोचे बॅनर हटवण्यात आले आणि शो रद्द करण्यासाठी दबाव आणण्यात आला.

माफी मागावी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2024 निवडणुकमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलंय कोण गद्दार आहे आणि कोण नाही. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा कोणाकडे आहे, हेही लोकांनी निश्चित केलं आहे. विनोद करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण हेतुपुरस्सर बदनामी सहन केली जाणार नाही. कुणाल कामराने माफी मागावी, अशी त्यांनी मागणी केली.
फडणवीस पुढे म्हणाले, संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते, पण त्यालाही मर्यादा आहेत. कुणालने राहुल गांधींच्या लाल संविधान पुस्तकाची पोस्ट शेअर करत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनीही संविधान नीट वाचलेलं नाही. 2024 मध्ये जनतेने देशद्रोही प्रवृत्तीला घरी पाठवलं. विनोद करता येतो, पण अपमान मान्य केला जाणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
पटोलेंचा टोला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयम बाळगण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘मतभेद असू शकतात, पण कुणीही कायदा हातात घेऊ नये. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याची वेळ येऊ नये, याची जबाबदारी आपल्यावर आहे. असे ते म्हणाले. कामराने आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधींनी दाखवलेले लाल संविधान पुस्तक शेअर केल्याने नवा वाद निर्माण झाला.
कुणाल कामरा वाद आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांच्या तोडफोडीवर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था नाही, लोक भीतीपोटी राज्य सोडत आहेत, उद्योग बाहेर जात आहेत.’ शांततेचा दावा करणारेच हिंसक वागत आहेत. हे सरकार महाराष्ट्राचा नाश करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
Nagpur : प्रेमसंबंधांच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या