
राज्यात सध्या गाजत असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी वळवला जात असल्याच्या मुद्द्यावर आमदार संजय गायकवाड यांनी वक्तव्य करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण केली आहे.
एका बाजूला लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून कोट्यवधींच्या निधीचा जुळवाजुळव सुरू आहे, तर दुसरीकडे या योजनेवरच आता सरकारमधील काही आमदार नाराजी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड यांनी या योजनेवर उघडपणे टीका करत, असा निधी उधळण्यापेक्षा गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च करा, असा स्पष्ट सल्ला सरकारला दिला आहे. रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या 352 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या साक्षीदार होण्यासाठी आलेल्या आमदार गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे परखड मत मांडले.
गायकवाड म्हणाले, लाडक्या बहिणींना सव्वा लाख कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला, हे ठीक. पण ज्या शिवरायांनी लाखो महिलांच्या अब्रूची राखराखण केली, त्यांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी तुम्ही कधी निधी देणार? असा प्रश्नही त्यांनी सरकारला थेट विचारला. गायकवाडांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत इतिहासाच्या काही महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा घेतला. रायरीचा डोंगर राजांनी किल्ल्यासाठी निवडला आणि कमी कालावधीत 350 इमारतींच्या या किल्ल्याची उभारणी झाली.

शिवरायांचे खरे वैभव
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांना दीर्घायुष्य लाभले असते, तर निजाम, मुघल, पोर्तुगीज आणि कुतुबशाहसारख्या सत्ताधीशांचा पत्ता इतिहासातूनच उठला असता, असेही ते म्हणाले.
गडकिल्ल्यांवर येणाऱ्या तरुणांना गायकवाड यांनी संयमाचे आणि शिस्तीचे आवाहन केले. खऱ्या शिवभक्तांना शिस्त सांगण्याची गरज नाही. मात्र, गडकिल्ल्यांवर प्रेमिकांचे नाव कोरणे किंवा अन्य विटंबना करणाऱ्या तरुणांनी हे प्रकार थांबवावेत, असे त्यांनी ठणकावून सांगितले. गडकिल्ल्यांच्या पुनरुत्थानाच्या बाबतीत सरकारने ठोस पावले उचलावीत, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
शिवरायांचे किल्ले जसे होते, त्या पद्धतीने त्यांची पुनर्बांधणी करावी. राजांच्या गडकिल्ल्यांना पुन्हा वैभव प्राप्त करून देणे ही काळाची गरज आहे, असा त्यांचा स्पष्ट संदेश होता. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना गायकवाड यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यावरही प्रतिक्रिया दिली. आता वेळ निघून गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवरायांचा मार्ग सोडून काँग्रेसचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मुंबईतील जनता त्यांना स्वीकारेल का, हा प्रश्न आहे, असे गायकवाड म्हणाले. एकूणच, सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या गदारोळात आमदार संजय गायकवाड यांचा हा गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांना विचार करण्यास भाग पाडतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.