
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज आणि पंडित नेहरू यांच्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांना जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांना कोंडीत पकडले.
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. त्यात मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर तीव्र वादंग पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत, वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्यावर अद्याप कारवाई का झालेली नाही? असा सवाल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आक्रमक पवित्रा घेतला आणि दानवेंना कडवट प्रत्युत्तर दिलं. त्यांनी नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ पुस्तकातील मजकुराचा संदर्भ देत विचारलं की, ‘नेहरूंनी शिवरायांबद्दल जे लिहिलंय त्याचा निषेध करण्याची हिंमत आहे का?’ त्यांच्या या प्रश्नामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ उडाला.

मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाम भूमिका घेत, ‘आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कधीच सहन करणार नाही’ असं ठणकावून सांगितलं. त्यांनी अभिमानाने छत्रपती संभाजी महाराजांचंही कौतुक करत म्हटलं, ‘देश, धर्मासाठी मराठ्यांनी बलिदान दिलं. शेर शिवा का छावा होता आणि महापराक्रमी एकमेव शंभूराजा होता’.
विरोधकांना आव्हान देत त्यांनी ‘जर खरंच ऐतिहासिक चुकीविरोधात उभे राहायचं असेल, तर पंडित नेहरूंनी जे शिवरायांबद्दल लिहिलं त्यावरही आवाज उठवा’ असं म्हटलं. मात्र, यावर विरोधकांनी शांतता पाळली आणि मुद्दा दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला.
अबू आझमींना शिक्षा
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती करताच सभागृहात तुफान वादंग झाला. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताच, अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी झाली. सरकारनेही त्वरित निर्णय घेत त्यांना विधानसभेतून बाहेर करण्याचा आदेश दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, अबू आझमीला 100 टक्के जेलमध्ये टाकू, पण त्याआधी तुम्ही स्वतःच्या पक्षातील लोकांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरही निषेध करायला शिका. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या पूर्वीच्या विधानांचा दाखला देत विचारलं, आव्हाड म्हणाले होते की औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते. त्यावर विरोधकांनी कधी निषेध केला का?
कोरटकर चिल्लर
फडणवीसांनी त्यांच्या भाषणात प्रशांत कोरटकर यांच्या प्रकरणावरही भाष्य केलं. विरोधकांनी कोरटकर यांना का अटक होत नाही? असा सवाल केला असता, फडणवीसांनी उत्तर दिलं, कोरटकर कोण आहेत? चिल्लर लोक आहेत, त्यांनी स्वतःच्या अटकेला कोल्हापूर न्यायालयातून स्थगिती घेतली आहे. यावरून सभागृहात अजूनच गदारोळ उडाला.