
चरणसिंह ठाकूर यांचे अनिल देशमुखांच्या कार्यकाळातील विकास कामे थांबविण्यासाठी बांधकाम विभागाला पत्र. या विरोधात सलील देशमुख यांचे काटोल मतदारसंघात ठिय्या आंदोलन.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल मतदारसंघात आमदार असताना काही विकासकामे मंजूर करवून घेतली होती. ही विकास कामे भाजपचे विद्यमान आमदार चरणसिंह ठाकूर यांनी थांबविली आहे. या विरोधात अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी नागपूर जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे मतदारसंघात ठाकूर विरुद्ध देशमुख सामना पाहायला मिळत आहे.
काटोल विधानसभा मतदारसंघाला अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काटोल मतदारसंघ गमावला. सलील देशमुख यांचा पराभव करत भाजपचे चरणसिंह ठाकूर यांनी विजय प्राप्त केला. निवडणुकीत जिंकल्यानंतर चरणसिंह ठाकूर यांनी अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली विकासकामे रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे सलील देशमुख यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

OBC Reservation : ‘सर्वोच्च’ निर्णयामुळे स्थानिक निवडणुकीचा भविष्यकाल अंधारात!
20 कोटींची विकास कामे
काटोल विधानसभा मतदारसंघातील अनिल देशमुख यांच्या कार्यकाळातील मंजूर विकास कामे रद्द करण्यात यावी, अशी मागणी चरणसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांना पत्र लिहून केली आहे. पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात सुमारे 20 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली होती. त्यासाठी निधी वितरणाचे आदेशही देण्यात आले होते. परंतु काटोलचे आमदार बदलले आणि ही कामे रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाला विकास कामे थांबविण्यासाठी पत्र देण्यात आले. त्यावर या विभागाने आमदार चरणसिंह ठाकूर यांच्या पत्रावर नेमके काय उत्तर द्यावे, यावर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. या पत्राची माहिती मिळताच सलिल देशमुखांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सलील देशमुख यांनी 28 जानेवारी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. मतदारसंघातील मंजूर कामे रद्द करून काय साध्य होणार, अशाप्रकारचे राजकारण योग्य नाही. ही कामे थांबविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सलील देशमुख यांनी दिला आहे.
गृहमंत्री झाल्यानंतर विकास निधी आणला होता खेचून
अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघाचे पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. अनिल देशमुख यांचे मतदारसंघात चांगलेच वर्चस्व राहिले आहे. त्यांनी राज्याचे गृहमंत्रीपदही सांभाळले आहे. गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी मतदासंघासाठी विकास निधी खेचून आणला. परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असताना त्यांच्यावर तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केले. त्यानंतर अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यांना तुरुंगात जावे लागले होते.
गृहमंत्रीपदाचा अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. तुरुंगात जाण्याच्या प्रकरणासाठी देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले होते. त्यासंदर्भात त्यांनी एक पुस्तक देखील लिहले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काटोलची उमेदवारी घोषित केली होती. परंतु ऐनवेळी अनिल देशमुख यांनी सुपुत्र सलील देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरविले अन् भाजपने बाजी मारली. आता विकास कामांच्या प्रश्नावर देशमुख विरुद्ध ठाकूर असा सामना मतदारसंघात रंगताना दिसून येत आहे.