
राजराजेश्वर मंदिराच्या श्रेयवादाच्या रणांगणात आता मदन भरगड यांनीही उडी घेतली आहे. मात्र त्यांनी 50 कोटींच्या निधीला वाढवून सांगितल्याने जनतेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.
अकोल्यात सध्या राजकारणाच्या रंगमंचावर एक भन्नाट नाटक रंगत आहे, त्याचं नाव आहे ‘श्रेयवादाचं महाभारत’. या नाटकात आता एका नव्या नेत्याने उडी मारली आहे. ते म्हणजे नुकतेच काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केलेले माजी महापौर मदन भरगड यांनी. भरगड यांनी एक जबरदस्त ‘एंट्री’ घेतली आणि थेट राज राजेश्वर मंदिराच्या श्रेय वादाच्या मध्यवर्ती रंगभूमीवर झेप घेतली.
मदन भरगड यांनी थेट घोषणा केली की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मंदिरासाठी तब्बल 250 कोटींचा निधी दिला आहे. भरगड यांचा आत्मविश्वास पाहता लोक थक्क झाले. पण काही सेकंदांतच प्रश्न उपस्थित होऊ लागले की, 250 कोटी कसे? पण सरकारी कागदांनुसार तर निधी फक्त 50 कोटींचा आहे. मग अचानक हे आकड्यांचं गणित चुकलं कुठे? का जाणूनबुजून आकडे वाढवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातोय? यामुळे जनता देखील गोंधळलेली आहे.

गुंतागुंतीची परिस्थिती
ही घोषणा केल्यानंतर शहरात आणि सोशल मीडियावर प्रचंड गोंधळ उडाला आहे. आधीच काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण, भाजपचे आमदार रणधीर सावरकर, दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या प्रयत्नांची जोरदार दावेबाजी सुरू होती. त्यात आता भरगड यांची भर पडल्यामुळे श्रेयाच्या समरांगणात परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.
खरे चित्र पाहायचे झाल्यास, अकोल्याच्या आराध्य दैवत असलेल्या राज राजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असून त्यासाठी 50 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात मंदिराचे गाभारे आणि सभामंडप, विशाल भक्तनिवास, दर्शन पोचमार्ग, सीसीटीव्ही, पार्किंग, दिंडी प्रवचनासाठी प्रेक्षक गॅलरी, स्वच्छता सुविधा अशा विविध कामांचा समावेश आहे.
Akola : राज राजेश्वर मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्जावर श्रेयवादाची झुंज
प्रयत्नांना यश
या कामांमुळे मंदिराच्या धार्मिक वैभवात भर पडणार असतानाच, श्रावण महिन्यात होणारी कावड यात्रा अधिक सुसज्ज होणार आहे. या तीर्थक्षेत्राच्या दर्जामागे विशेषत: दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांची दूरदृष्टी आणि प्रयत्न होते. त्यांनी वर्षानुवर्षे हे स्वप्न जपलं होतं. भाजपचे आमदार रणधीर सावरकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे प्रत्यक्षात उतरलं.
भाजपने यासाठी अधिकृत वेळापत्रक, पत्रव्यवहार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा आराखडा सादर करत श्रेयाचे पुरावे मांडले. त्यानुसार, आमदार सावरकर यांनी 16 जूनला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, 18 जूनला प्रधान सचिवांनी तातडीच्या सूचना दिल्या आणि २३ जूनला आराखडा नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला.
नाव केंद्रस्थानी
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण देखील आपण सतत पाठपुरावा केला, असे सांगून राजकीय श्रेय आपल्या वाट्याला यावे म्हणून जोरदार प्रयत्न करत आहेत. अकोल्यात झालेल्या दंगलप्रसंगात राज राजेश्वर मंदिरावर दगडफेक झाली होती. या दंगलीच्या केंद्रस्थानीही साजिद खान पठाण यांचेच नाव होते. त्यावेळी मंदिराच्या नुकसान भरपाईसाठी पठाण यांनी प्रयत्न केले होते, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.
परंतु या सर्व राजकीय पात्रांमध्ये भरगड यांनी केलेली 250 कोटींच्या निधीची घोषणा हा सध्याच्या गोंधळाचा केंद्रबिंदू बनली आहे. सरकारकडून अधिकृतपणे फक्त 50 कोटींच्या आराखड्याला मान्यता मिळाल्याचे स्पष्ट असतानाही भरगड यांचे 250 कोटी कुठून आले, याचा उलगडा होत नाही. त्यांनी ही आकडेवारी अजित पवारांच्या नावाने सांगितली. त्यामुळे आता अजित पवार यांच्या कार्यालयाकडे देखील या घोषणेचा मागोवा घेतला जात आहे.
महायुतीच्या काळातच मान्यता
या सगळ्या गदारोळात सामान्य जनतेसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. खरं श्रेय नक्की कोणाचं? आणि सर्वात महत्त्वाचं, मंदिरासाठी मिळालेल्या निधीची खरी आकडेवारी काय? महत्त्वाचं म्हणजे, महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाचा कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आला नव्हता, असे खुद्द नगरविकास विभागाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे, ही संपूर्ण प्रक्रिया आणि मान्यता महायुती सरकारच्या काळातच पूर्ण झालेली आहे.
श्री राज राजेश्वर संस्थानाच्या या ऐतिहासिक दर्जाकडे केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक विजय म्हणून न पाहता, हे श्रेय कुणाचं यासाठी रंगणाऱ्या राजकीय नाट्याच्या नजरेतूनही पाहावं लागतंय. अकोल्यात महापालिका निवडणुकींच वातावरण तापलेलं असताना, या प्रकारच्या श्रेयवादाच्या लढाया भविष्यात आणखी गंभीर आणि गोंधळजनक वळण घेतील, हे निश्चित. पण शहरवासीय आणि भक्तांसाठी, शब्दांचा युद्धनाद नाही तर मंदिराच्या घंटांचा गजर महत्त्वाचा आहे.