
मुख्य सचिवपदाच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सुजाता सौनिक यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात नव्या नेतृत्वाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यातील प्रशासन यंत्रणेचा कणा असलेल्या मुख्य सचिवपदासाठी सध्या मंत्रालयात मोठी रस्सीखेच सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागलेली असतानाच, राज्य प्रशासनाला आणखी एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, नव्या मुख्य सचिवांची नियुक्ती. कारण, राज्याच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्य सचिव ठरलेल्या सुजाता सौनिक या येत्या 30 जून रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
सौनिक यांच्या कार्यकाळात प्रशासनाला एक अभ्यासू, निग्रही आणि निर्णायक नेतृत्व लाभले होते. त्यांनी जून 2024 मध्ये मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली होती आणि तब्बल वर्षभर त्यांनी या पदाचा प्रभावी कार्यभार सांभाळला. त्यांची निवृत्ती जवळ येत असताना आता मंत्रालयात संभाव्य उत्तराधिकारी म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत.

चर्चेतील नावे
मुख्य सचिवपदासाठी सध्या चर्चेत असलेली तीन नावे म्हणजे राजेशकुमार, आय.एस. चहल आणि भूषण गगराणी. हे तिन्ही अधिकारी सेवा, अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य यांच्या बाबतीत तगडे मानले जातात. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायनिर्णयावर अवलंबून आहे. राजेशकुमार हे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असून ते 1988 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ऑगस्ट 2025 मध्ये ते सेवानिवृत्त होत असल्याने, तीन महिन्यांसाठी त्यांना मुख्य सचिवपद देण्याचा पर्याय सेवाज्येष्ठतेच्या निकषानुसार विचाराधीन आहे.
आय.एस. चहल, सध्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. 1989 च्या तुकडीचे हे अधिकारी जानेवारी 2026 मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा प्रशासनाला निवडणूक काळात होऊ शकतो, असे मत वर्तवले जात आहे. भूषण गगराणी, 1990 बॅचचे अधिकारी असून सध्या मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मार्च 2026 मध्ये ते सेवानिवृत्त होणार असून, प्रभावी कार्यशैलीमुळे त्यांचे नावही चर्चेत आले आहे.
निर्णयावर सर्वांचे लक्ष
मुख्य सचिवाच्या निवडीत फक्त सेवाज्येष्ठता पाहिली जाईल की कामकाजाची क्षमता आणि राजकीय समन्वयाची कला, हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. कारण, यापूर्वीही मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या निवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठतेच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतला होता. त्यामुळे यावेळी देखील तसेच काही चित्र पाहायला मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही महिन्यांत राज्यात महत्त्वाच्या महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, प्रशासनात वेग, अचूकता आणि प्रभावी समन्वय ठेवू शकणाऱ्या अधिकाऱ्यालाच मुख्य सचिवपदाच्या जबाबदारीसाठी पुढे केले जाईल, अशी शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या मुख्य सचिवाच्या निवडीसाठी अंतिम निर्णय लवकरच होणार आहे. ही नियुक्ती केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एक गोष्ट मात्र निश्चित की, सुजाता सौनिक यांच्यानंतरचा मुख्य सचिव कोण? या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत मंत्रालयातील चर्चा आणि गृहितकांना उधाण येणार, हे निश्चित.