
यंदाच्या महाराष्ट्र अर्थसंकल्पीय उन्हाळी अधिवेशनात एकूण 12 विधेयकं मंजूर झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले आणि यंदाच्या अधिवेशनाने अनेक घडामोडींना जन्म दिला. अर्थसंकल्पाच्या या सत्रात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. मंत्र्यांचे राजीनामे, नागपूरमधील दंगे, स्वारगेट बस प्रकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि लाडक्या बहिणीच्या अनुदानाचा प्रश्न या सगळ्या विषयांवर जोरदार चर्चा रंगल्या. यंदाचं हे अधिवेशन काही केवळ चर्चांसाठीच नव्हते, तर अनेक प्रस्ताव मांडण्यात आले. किती प्रस्ताव मंजूर झाले, किती चर्चांमध्ये वेळ वाया गेला, याची आकडेवारी स्पष्ट झाली आहे.
अधिवेशनाच्या समारोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अधिवेशनातील महत्त्वाच्या निर्णयांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की या अधिवेशनात 12 महत्त्वाची विधेयके मंजूर झाली, आणि शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना विरोधकांवर निशाणा साधला. ‘पाच वर्षांची टेस्ट मॅच असली तरी आम्ही 20-20 प्रमाणे काम करणार’ असे ते म्हणाले. त्यांनी विरोधकांवर टीका करत सांगितले की, ते एकाच मुद्द्यावर घुटमळत आहेत आणि त्यांना जनतेच्या कामाचा काहीही विचार नाही.

Ambadas Danve : शिवसेना म्हणजे सत्ता नव्हे तर समाजासाठीची निष्ठा
कामकाजाची आकडेवारी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 16 बैठका घेण्यात आल्या, ज्यामध्ये 146 तास प्रत्यक्ष कामकाज झाले. मात्र, विविध कारणांमुळे 1 तास 25 मिनिटे आणि मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे 20 मिनिटे वाया गेले. दररोज सरासरी 9 तास 7 मिनिटांचे कामकाज झाले. तारांकित प्रश्नांपैकी 6 हजार 937 प्रश्न प्राप्त होऊन 491 स्वीकृत झाले, मात्र फक्त 76 उत्तरे मिळाली. अल्पसूचना प्रश्न 14 होते, त्यापैकी फक्त 1 संमिलित झाला, तर 13 अस्वीकृत राहिले. अल्पकालीन चर्चेसाठी 2 सूचना प्राप्त झाल्या, त्यापैकी 1 मान्य, तर 1 अमान्य ठरली. नियम 97 अन्वये 60 सूचना प्राप्त झाल्या, मात्र कोणतीही मान्य किंवा चर्चेस घेतली गेली नाही. लक्षवेधी सूचनांमध्ये 2,557 सूचना प्राप्त झाल्या, त्यातील 442 स्वीकृत होऊन 129 वर चर्चा झाली.
शासकीय विधेयकांपैकी 9 प्रस्तावित झाले आणि सर्व संमत झाले, तर विधान परिषदेकडून 3 विधेयकांना मंजुरी मिळाली. अशासकीय विधेयकांपैकी 42 सूचना प्राप्त झाल्या, 22 प्रस्तावित झाल्या, मात्र कोणतीही संमत झाली नाही. नियम 293 अन्वये 5 सूचना आणि अर्धातास चर्चेसाठी 54 सूचना प्राप्त झाल्या, त्यातील काही चर्चेला घेण्यात आल्या. शासकीय ठरावांसाठी 2 सूचना प्राप्त होऊन त्या दोन्ही मान्य झाल्या आणि चर्चाही पार पडली. नियम 293 अन्वये 5 सूचना प्राप्त झाल्या, त्यापैकी सर्वच मान्य करून चर्चेस घेतल्या गेल्या. अर्धातास चर्चेसाठी 54 सूचना प्राप्त झाल्या, त्यापैकी 42 स्वीकृत, मात्र केवळ 3 चर्चेला घेण्यात आल्या. सार्वजनिक महत्त्वाच्या 209 सूचनांपैकी 48 मान्य झाल्या, मात्र केवळ 3 वर चर्चा झाली. अशासकीय ठरावांपैकी 151 पैकी 94 मान्य झाले, मात्र फक्त 2 ठरावांवर चर्चा झाली. अधिवेशनात 4 अभिनंदनपर प्रस्तावही मांडण्यात आले.
Prataprao Jadhav : कायद्याच्या कचाट्यातून कुणाल कामरा सुटणार नाही
सरकार विरोधक आमनेसामने
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत अधिकृत घोषणा केली की, महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 30 जून 2025 रोजी होईल. या अधिवेशनात राज्याच्या भविष्यासाठी आणखी मोठे निर्णय होतील, अशी अपेक्षा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाने अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींना वेग दिला. राजकीय वाद, चर्चांचे रंग आणि काही निर्णायक प्रस्तावांनी हे अधिवेशन संस्मरणीय ठरले. आता सर्वांच्या नजरा येत्या पावसाळी अधिवेशनाकडे लागल्या आहेत.