
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांना चॉकलेट भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या गोड भेटीमागे राजकीय रणनीती आहे की मैत्रीचा नवा अध्याय सुरू होतोय, यावर उत्सुकता आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरणं तयार होणं काही नवं नाही. कधी कटुता, कधी जवळीक. सत्ता आणि समीकरणं बदलताना मैत्रीही नवी रंगत घेते. महायुतीतील तणाव, ठाकरे गटाची महाविकास आघाडीत वाढती अस्वस्थता आणि भाजपची राजकीय रणनीती यामुळे सध्या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एक अनपेक्षित क्षण घडला, भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांना चॉकलेट भेट दिलं. ही एक साधी भेट होती की मैत्रीचा नवा अध्याय सुरू करण्याचा इशारा?
राजकारणात संबंधांमध्ये उष्णता आणि थंडावा येणं साहजिक आहे. एकेकाळी एकत्र असलेले मित्र दूर जातात, पण काही गोड क्षण मैत्री पुन्हा जिवंत करतात. चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या या साध्या चॉकलेटमागे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. भाजप-शिंदे गटातील अंतर्गत कुरघोड्या आणि ठाकरे गटाची अस्वस्थता लक्षात घेतल्यास, या चॉकलेट भेटीला अनोखी राजकीय व्याख्या मिळतेय. संसदीय परंपरेचा भाग म्हणून ही भेट दिली गेली असली तरी काँग्रेस नेते सतेज पाटलांना चॉकलेट न देणं, हा एक वेगळाच सिग्नल देतोय.

मैत्रीचे सोनेरी क्षण
भाजप आणि ठाकरे गटाच्या वाढत्या जवळीकीकडे लक्ष दिल्यास, काही महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख करावाच लागेल. 27 जून 2024 रोजी चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंना चॉकलेट भेट देण्यात आलं. त्यानंतर 17 डिसेंबर 2024 ला मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतः फडणवीसांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. अवघ्या तीन दिवसांनी, म्हणजेच 20 डिसेंबर 2024 रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान आदित्य ठाकरेंनी देखील फडणवीसांची भेट घेतली.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच, 3 जानेवारी 2025 रोजी गडचिरोलीतील विकासकामांबाबत शिवसेनेच्या मुखपत्रातून फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं. त्यानंतर 9 जानेवारी 2025 रोजी आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा फडणवीसांची भेट घेतली. यानंतर 29 जानेवारी 2025 रोजी पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. या सर्व घडामोडी राजकीय समीकरणांच्या बदलत्या दिशा स्पष्टपणे दर्शवतात. भाजप आणि शिंदे गटामधील वाढता तणाव, तसेच ठाकरे गटाचं अधूनमधून भाजपच्या बाजूने झुकणं, हे पाहता ‘जुने मित्र पुन्हा एकत्र येणार का?’ असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘यारी भी, सियासत भी’
भाजप आणि शिंदे गटामधील तणाव वाढत आहे, हे सर्वश्रुत आहे. अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपकडून दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. अशात ठाकरे गटाला जवळ करणं म्हणजे शिंदे गटावर दबाव आणण्याची खेळी असू शकते. भाजपचं ठाकरेंकडे वाढतं लक्ष म्हणजे ‘पुराने दोस्त वापस आ रहे हैं’ असं मानायचं की ‘दोस्ती के नाम पर राजनीति’ आहे, हे आगामी काळ ठरवेल.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) ठाकरे गटाला अनेक महत्त्वाच्या निर्णयांपासून दूर ठेवत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची रणनीती काय असेल, याकडे लक्ष लागलंय. मैत्री जपणं वेगळं आणि राजकीय गरजा वेगळ्या त्यामुळे ही भेट ‘कुछ मीठा हो जाये’साठी होती की यामागे आणखी काही आहे, हे पाहणं रंजक ठरेल.
चॉकलेट डिप्लोमसी
राजकारणात गोडवा अचानक वाढतो तेव्हा त्यामागे काही ना काही सूत्र असतं. भाजप-ठाकरे गटाची वाढती जवळीक ही केवळ मैत्री आहे का शिंदे गटावर दबाव टाकण्याची रणनीती, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र, ‘दोस्ती हो तो ऐसी जो वक्त के साथ और गहरी हो’ या म्हणीप्रमाणे, जर हा खराखुरा ‘यारी’चा नवा अध्याय असेल, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा मिळणार हे नक्की.