
Views: 19872
राज्याच्या शेवटच्या कोपऱ्यात असलेल्या गडचिरोलीला मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हावासियांसोबत वेळ घालवला.
माओवादाच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त होऊ पाहत असलेल्या गडचिरोलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. आपल्या गडचिरोली भेटीत त्यांनी चिमुकल्यांची संवाद साधला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसह एसटी बसमधून प्रवास केला. स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर गडचिरोलीतील बसची सेवा मिळाली. गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावरील जवळपास 15 गावांना पहिल्यांदाच बससेवा मिळाली आहे. विशेष म्हणजे बस सेवेच्या लोकार्पणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बसमधून प्रवास केला.

छत्तीसगड सीमेच्या दिशेने अनेक किलोमीटरपर्यंत महाराष्ट्राच्या भागात पक्के रस्ते आणि पुलच नव्हते. त्यामुळे गडचिरोलीतील बस सेवा केवळ गर्देवाडा पर्यंतच बस जायची. पोलिसांनी माओवाद्यांचा खात्मा सुरू केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानेही हिम्मत करत गट्टा ते वांगेतुरी दरम्यान 32 किलोमीटरचा रस्ता निर्माण केला. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील बस सेवा आणखी सक्षम झाली आहे.
आदिवासींना मोठं Gift
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये दाखल झालेत. जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची त्यांनी संवाद साधला. त्यानंतर गडचिरोली पोलिसांना मिठाईचे वाटप करत त्यांनी शुभेच्छा दिल्या. ताडगुडा पुलाचे लोकार्पण फडणवीस यांनी केले. लाॅईड्स मेटलच्या राज विद्यानिकेतन सीबीएससी शाळेचे लोकार्पण देखील त्यांनी केले. लाॅईड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटल, लाॅईड्स नव्या क्लोदिंग कंपनी, फॅमिली काॅर्टर्स, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, पोलीस काॅर्टर्स, जिमखाना व बालोद्यान या उपक्रमांचे उद्घाटनही करण्यात आले.
पेनगुंडा येथील पोलीस मदत केंद्राची पाहणी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीला लवकरच स्टील सिटी म्हणून नावलौकिक प्राप्त होईल. गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने 1 जानेवारी 2025 हा दिवस नवीन सूर्योदयाचा आहे. आगामी काळामध्ये गडचिरोलीचा चेहरामोहरा बदललेला दिसेल. गडचिरोलीतील माओवादी आत्मसमर्पण करीत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील एकही युवक माओवादी चळवळीत सहभागी झालेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Naxal चळवळ समाप्तीकडे
गडचिरोलीमधील माओवादी चळवळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून गडचिरोली आणि शेजारच्या राज्यांमध्ये माओवाद संपवण्यासाठी प्रभावी उपाय करीत आहेत. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर मूलभूत विकास होत आहे. उद्योगांची संख्या देखील वाढत आहे. विकासाच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या माओवाद्यांशी दोन हात करण्याची क्षमता पोलिसांनी सिद्ध केली आहे. त्यामुळे गडचिरोली आणि आसपासच्या परिसरामध्ये परिवर्तन दिसत आहे. ज्या भागामध्ये स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष बस गेली नव्हती, तिथे आम्ही परिवहन सेवा उपलब्ध करून दिली. याबद्दल आनंद वाटत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.