
राज्याच्या राजकारणात आधीच मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद पेटलेला असताना, आता दहावीच्या ‘हिंदी लोकभारती’ पाठ्यपुस्तकातील संविधानातील त्रुटींमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सध्या एकच प्रश्न जळजळीत बनला आहे. शाळांमध्ये शिकवायची भाषा कोणती? वर्गखोलीतला हा सवाल आता थेट विधानभवनापर्यंत दणक्यात पोहोचला आहे. भाषेच्या अस्मितेचा आणि सांस्कृतिक ओळखीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. शिक्षण धोरणातल्या एका नव्या निर्णयामुळे या वादात अजूनच फुंकर घालण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निर्णयानुसार महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा ‘तिसऱ्या भाषेच्या’ स्वरूपात अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळेच राज्यभर मराठीप्रेमी वर्गात संतापाची लाट उसळली. मराठीवर घाला का? असा थेट सवाल विचारला जातोय.
पहिलीपासूनच हिंदी सक्तीच्या निर्णयावर आधीच वाद पेटलेला असताना, आता नव्या चुकीच्या घटनेने त्या आगीवर तेल ओतलं आहे. राज्य मंडळाच्या दहाव्या वर्गाच्या ‘हिंदी लोकभारती’ या पुस्तकात थेट भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत चूक आढळली आहे. संविधानातील ‘धर्मनिरपेक्ष’ हा मूलभूत शब्द गायब करून ‘पंथनिरपेक्ष’ असा शब्द वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘श्रद्धा’ या शब्दाऐवजी ‘धर्म’ आणि ‘स्वतः प्रत अर्पण’ ऐवजी ‘आत्मार्पित’ असे शब्द छापले गेले आहेत. इतकंच नव्हे तर, ’26 नोव्हेंबर 1949’ तारखेपुढे अनावश्यकपणे (मीती मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत दो हजार छह विक्रमी) असा उल्लेख करण्यात आला आहे.

Nana Patole : सत्तेच्या मग्रुरीत बुडालेले नेते बळीराजांच्या मेहनतीला विसरले
शब्दबदलावर संशयाचे सावट
शब्दबदलामागे केवळ भाषिक चूक आहे की हेतूपुरस्सर विचारधारा बदलण्याचा प्रयत्न आहे, यावर आता थेट प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विविध संघटनांनी हा मुद्दा चव्हाट्यावर आणत, ’ही चूक नव्हे तर कारस्थानी कृत्य आहे’ असा आरोप केलाय. याच पुस्तकात संविधानातील भाग चार (क) मधील ‘मूलभूत कर्तव्य’ भागामध्ये आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली. ‘समता’ या शब्दाऐवजी थेट ‘समरसता’ शब्द वापरला गेलाय. जो शब्द विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी संबंधित असल्याचा आरोप होतोय. या प्रकरणावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ठाकूर यांच्या मते, ‘दहावीच्या हिंदीच्या पुस्तकामध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेत आणि मूलभूत कर्तव्यात शब्दच्छल करून कारस्थानी कृत्य केलं गेलं आहे. भारतीय संविधानाचा गाभा पद्धतशीरपणे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.’ यशोमती ठाकूर यांनी मागणी केली की, ‘बालभारतीने तातडीने हे पुस्तक मागे घ्यावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी.’ हा मुद्दा आता केवळ शैक्षणिक न राहता थेट राजकीय रणधुमाळीचा भाग बनला आहे. राज्यात आधीच हिंदी सक्तीच्या निर्णयावरून वातावरण तापलेले असताना, संविधानाच्या प्रास्ताविकेतील ही चूक आगीत फुंकर घालणारी ठरत आहे.
Amol Mitkari : ठाकरे बंधूंच्या मराठी लढ्यात दादांच्या आमदाराची हजेरी
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे राज ठाकरे मराठी भाषेचा अस्मितेसाठी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. येत्या काळात हा वाद केवळ शिक्षणपुरताच मर्यादित राहतो का, की तो राज्याच्या सांस्कृतिक आणि राजकीय समिकरणांना हादरवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.