
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावर टीका होत आहे. राज्यात सध्या पटोले हटाव मोहीम राबविण्यात येत आहे.
राज्यात काँग्रेसमध्ये सध्या दुफळी निर्माण झाली आहे. विशेषत: विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हटाव मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळं लवकरच नाना पटोले हे राजीनामा देतील असं चित्र निर्माण झालं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. त्याचं श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आलं. राज्यात सर्वाधिक जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या. महायुतीमधील दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र याच्या अगदी विरुद्ध झालं.
विधानसभेत महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला. महाविकास आघाडीला तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. शिवसेनेला निवडणुकीत 20 जागा मिळाल्या. काँग्रेसनं 16 जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागांवर समाधान मानवं लागलं. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली. आता पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यांच्या जागेवर काँग्रेसमधील अनेक नावं चर्चेत आहेत.

कोण होणार Leader?
पटोले यांच्या जागेवर कोण नवीन प्रदेशाध्यक्ष होणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. विजय वडेट्टीवार, बाळसाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ही नावं या पदासाठी चर्चेत होती. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सर्वांत आघाडीवर आहे. काँग्रेस हायकमांडकडून प्रदेशाध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. यासाठी चव्हाण दिल्लीकडं रवाना झाले आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील असं सांगण्यात येत आहे. चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तात्काळ बोलावण्यात आलं आहे.
दिल्लीत निर्णय झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाऊ शकते. महाराष्ट्रातील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. काँग्रेसकडून याची दखल घेण्यात आली आहे. काँग्रेसचे अनेक नेते सध्या पटोले हटाव मोहित सुरू करून बसले आहेत. त्यामुळं चव्हाण यांच्याकडं प्रदेशाध्यक्ष पद येण्याची शक्यता आहे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला केवळ 16 जागा जिंकता आल्या. आता काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्यास पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याला मोठं स्थान मिळणार आहे. काँग्रेसमधील अनेक आमदारही सध्या पटोले हटाव मोहिमेत सहभागी झाले आहेत.