महाराष्ट्र

सैफवरील हल्ल्यावरून Nana Patole देखील भडकले

महायुती सरकारवर Congress कडून हल्लाबोल

Share:

Author

सैफ अली खानवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. काँग्रेसकडून अशी टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी ही टीका केली आहे.

महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या घटना वाढत आहे. महायुती सरकारचे हे अपयश आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे निष्क्रिय आहेत. त्यामुळं त्यांनी गृहमंत्री पद सोडावं, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केलं. पोकळ विधानं करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी ठोस कृती करण्याचे धाडस दाखवावं, अशी मागणीही त्यांनी केली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला खुनी हल्ला निषेधार्ह आहे. महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी ही घटना आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे, असा प्रश्न पटोले यांनी केला.

मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपा युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावला आहे. सैफ अली खानवरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्था दिलेले आव्हान असल्याचं पटोले म्हणाले. महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावला आहे. महायुती सरकारचे हे अपयश आहे, असा घणाघाती हल्लाबोल आमदार नाना पटोले यांनी केला.

सैफ अली खानवर हल्ल्यानंतर Politics पेटलं

कठोर उपाय गरजेचे

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भाजप सरकारचा पटोले यांनी समाचार घेतला. भाजप सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राज्याकडं लक्ष नाही. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या अत्यंत निष्क्रिय आहेत. मुंबईला दोन पोलिस आयुक्त आहेत. तरीही मुंबईत कायदा व सुव्यवस्था नाही. मुंबईत कोणीही सुरक्षित नाही. बीडमधील संघटीत गुन्हेगारी मोकाट आहे. त्याला राजकीय आशिर्वाद आहे. परभणीत पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. वांद्रा येथे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. या गंभीर घटना आहेत. गृहमंत्री पद सांभाळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. राज्यात सेलिब्रिटी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सर्वसामान्य जनता कोणीही सुरक्षित नाही, असंही पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ विधानं करीत आहेत. गुन्हेगारांना सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा करू, अशा विधानांचे पालुपद फडणवीस करीत आहेत. त्यांनी हे सोडून कठोर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी. राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. अशात फडणवीस गंभीर नसल्याचं दिसत आहे. अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असा निष्क्रिय व कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला लाभला, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!