
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संपूर्ण राज्याच्या विकासाचा हा आर्थिक ब्लूप्रिंट कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वर्ष 2024 हे महायुती सरकार आणि भाजपसाठी जणू काही रंगीबेरंगी होळीप्रमाणे सुरू झालं. सुरुवातीला काही काळ काळोखी ढगांनी आकाश व्यापलं होतं, पण वर्षाच्या शेवटी मात्र विजयाच्या रंगांनी सगळं आनंदमय झालं. लोकसभा निवडणुकीत महायुतीला कुणाची तरी नजर लागली आणि पराभवाचा फटका बसला. पण “मराठी माणूस हरत नाही ” असं म्हणत त्यांनी हिम्मत हरली नाही. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली आणि लाडकी बहीण योजना हा ट्रम्प कार्ड खेळला. या योजनेत महाराष्ट्राच्या महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये देण्याची घोषणा झाली आणि मग काय, मतदारांनी महायुतीला भरभरून मतं दिली. सत्तेच्या खेळात महाविकास आघाडी विरोधात होती, पण लाडक्या बहिणींचा आशीर्वाद डोक्यावर असल्याने महायुतीला कसलीच टेन्शन नव्हती. पहिल्याच फेरीत विजयाचा ढोल वाजला आणि महायुती पुन्हा सत्तेत आली.
सगळ्यांचं लक्ष आहे ते उद्याच्या अर्थसंकल्पाकडे. 10 मार्च 2025 रोजी, महाराष्ट्राचे लाडके ‘अजित दादा’ हे विधानभवनात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ‘हातात बॅग आणि बॅगेत जादू’ असं म्हणत ते काय काय घोषणा करणार, याची उत्सुकता प्रत्येक घरात आहे. महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनानंतर लाडकी बहीण योजनेत दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याची घोषणा झाली. इतकंच नाही, तर होळीच्या उंबरठ्यावर महिलांना साडीचं गिफ्ट देण्याचंही ठरलंय. ‘रंगात रंग मिळाला’ असं म्हणत होळीच्या रंगात महायुतीनेही आपला रंग मिसळला आणि जनतेला खूश करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी नव्या लढाईची हाक
होळीच्या रंगात धमाका
महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू झालंय आणि गेल्या आठवड्यात अनेक मुद्द्यांवर गाजलंय. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच बीडचे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आता माणिकराव कोकाटे यांच्या नावाची चर्चा आहे. ‘एक एक पान गळतंय’ असं म्हणत महायुतीला गळती लागल्याची चर्चा आहे. पण तरीही अजित दादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या त्रिकुटाने महाराष्ट्राचा गाडा हाकण्याची जबाबदारी घेतलीय. ‘तिघं सोबत, तर विजय ओघात’ असं म्हणत त्यांनी विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केलाय.
अर्थसंकल्पात शेतकरी, रोजगार आणि लाडक्या बहिणींसाठी काय नवीन योजना येतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. होळी जवळ आलीय आणि ‘रंग उधळणार का काय?’ असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. काहींच्या मते, अजित दादा आपल्या जादूच्या पेटीतून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, तर महिलांसाठी आणखी काही भेटवस्तू काढतील. विरोधक मात्र आक्रमक भूमिकेत आहेत. केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला फारसं काही मिळालं नाही, पण राज्याच्या या बजेटमधून महाराष्ट्राचा विकास कसा होईल, याची आतुरता सगळ्यांना आहे.
आतुरता उद्याची
होळीच्या सणाला महाराष्ट्राच्या राजकारणात लाल रंग लागेल की हिरवा कंदील मिळेल, हे उद्याच कळेल. ‘होळी रंगली, पण सत्ता कोणाची जळाली?’ असं म्हणत महायुती आणि विरोधकांमध्ये जोरदार रंग खेळला जाणार आहे. पुढील पाच वर्षांत महायुती काय नवीन खेळ खेळणार, हे पाहणं रंजक ठरेल. सध्या तरी अजित दादांच्या हातातली जादूची पेटी आणि होळीचा रंग यामुळे महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे.