
महाराष्ट्र शासनाने घरकुल बांधणाऱ्या नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. बांधकारांना आता पाच ट्रक मोफत वाळू देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने घरकुल बांधणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व घरकुल बांधणाऱ्यांना आता पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा करत राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे लाखो लोकांना फायदा होईल, असे सांगितले.
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झालेले नाहीत, तसेच जिथे पर्यावरण मंजुरी मिळाली आहे, तिथेच हा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक तरतुदी करण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे.

राज्यातील संकट कमी
वाळूच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी सरकार नवीन धोरण आखत आहे. महसूलमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात वाळूची मागणी आणि पुरवठा यामधील तफावत भरून काढण्यासाठी ‘एम सँड’ धोरण राबविले जाणार आहे. यामुळे दगड खाणींमधून मिळणाऱ्या वाळूचा वापर वाढेल आणि नदीतील वाळूवरील अवलंबित्व कमी होईल.
सोबतच प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर स्टोन क्रशर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कृत्रिम वाळू निर्मितीला चालना मिळेल आणि पर्यावरणीय नुकसानही टाळता येईल. बावनकुळे यांनी सांगितले की, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पुढील दोन वर्षांत राज्यातील वाळू संकट मोठ्या प्रमाणात कमी होईल.
Congress : राणेंच्या सिंधुदुर्गातील गडाला सपकाळांकडून सुरुंगाचे प्रयत्न
राजकीय वादांना बगल
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी काही राजकीय विषयांवर भाष्य करणे टाळले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे काँग्रेसच्या वाटेवर होते असा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, माझे लक्ष संजय राऊत काय म्हणतात याकडे नसते. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत आणि आम्हाला जनतेच्या भल्यासाठीच पुढे जायचे आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, राजकीय चर्चांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासावर भर देण्याचे आमचे प्राधान्य आहे. संकल्प पूर्ण करणे हे आमच्या सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.