महाराष्ट्र

Ajit Pawar : एसटी ही सेवेसाठी, नफा मिळविण्यासाठी नाही 

MSRTC : अर्थमंत्र्यांनी मांडला एसटीचा आर्थिक आराखडा 

Author

एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा संपूर्ण पगार न मिळाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावर गांभीर्याने लक्ष देत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा संपूर्ण पगार मिळालेला नसल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कर्मचाऱ्यांना केवळ 56 टक्के पगार मिळाला असून उर्वरित 44 टक्के रक्कम रखडली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण देत कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत तातडीने माहिती घेण्याचे आश्वासन दिले आहे.

“एसटी कर्मचाऱ्यांचा पगार ही गंभीर बाब आहे. मी स्वतः याबाबत सर्व तपशील घेऊन यावर लवकरच निर्णय घेणार आहे,” असे पवार यांनी स्पष्ट केले. मात्र त्यांनी याचबरोबर असेही नमूद केले की, एसटी महामंडळाला राज्य शासनाकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाते. अजित पवार यांनी जोर देऊन सांगितले की, कोरोनाकाळात एसटी महामंडळाला दर महिन्याला 250 ते 300 कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडून देण्यात येत होती. फक्त पगारापुरतीच नव्हे, तर विविध मोफत आणि सवलतीच्या योजनेसाठीदेखील शासन दरवर्षी अर्थसंकल्पातून तरतूद करत असते आणि त्याचे पैसे एसटीला दिले जातात.

धोरणात्मक निर्णय

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ई-व्हेईकल प्रस्तावावर अर्थमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. हा प्रस्ताव सरकारकडे आला असून तो मंजूर केला जाणार आहे. पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली ही भविष्यातील गरज आहे. एसटी त्याकडे वाटचाल करणार आहे, असे पवारांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी सखोल नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एसटीच्या मालकीच्या अनेक जागा राज्यातील मध्यवर्ती व महत्त्वाच्या ठिकाणी आहेत. या जागा बीओटी तत्वावर खासगी संस्थांना देण्याचा निर्णय झाला आहे. त्यावर 60 वर्षांचा करार केला जाईल. जो पुढे 30 वर्षांनी वाढवता येईल, असे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis : नागपुरात होणार शेती, उद्योग आणि विकासाचा संगम 

अजित पवार यांनी एसटीच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले की, देशातील कोणतीही सार्वजनिक प्रवासी संस्था नफा मिळवण्यासाठी चालवली जात नाही. त्यांचे उद्दिष्ट सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात सेवा देणे हेच असते. एसटीसारख्या संस्था ग्रामीण भागातील गरिबांचा, विद्यार्थ्यांचा, महिलांचा आधार असतात. त्यामुळे त्यांचे अस्तित्व टिकवणे आवश्यक आहे.

लवकरच मार्गी लागेल

कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत चिंता व्यक्त करताना अजित पवार यांनी आश्वासन दिले की, “या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत आहे. जे काही रखडले आहे, ते का झाले याची माहिती घेऊन योग्य त्या उपाययोजना केली जाईल. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे आता एसटी महामंडळाच्या आर्थिक सुधारणांसह कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे प्रश्नही लवकरच मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या राज्यात एसटीच्या भविष्यातील योजना, तांत्रिक प्रगती, आणि उत्पन्नवाढीचे मॉडेल यावर सरकारचे लक्ष केंद्रित आहे. त्याचे नेतृत्व अर्थमंत्री अजित पवार स्वतः करत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!