
संपूर्ण राज्यात खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. राज्याच्या विविध भागांतून बोगस बियाण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघड झाले आहे.
राज्यात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा एकदा बोगस बियाण्यांचे सावट गडद झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अप्रमाणित बियाण्यांची बाजारपेठ गुपचूप सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे. सातत्याने होणाऱ्या छाप्यांमुळे यंदा हे प्रकार अधिकच उजेडात येत आहेत. कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कळंब, बाभुळगाव आणि राळेगाव तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ४०० पाकिटे अनधिकृत कापूस बियाण्यांची पकड झाली आहे. वाहनांद्वारे गुपचूप वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, 12 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाभुळगाव येथील बसस्थानकाजवळ संशयास्पद वाहनातून भारत सरकारने प्रतिबंधित केलेले कापूस बियाण्यांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिस व कृषी विभागाच्या पथकाला मिळाली. तत्काळ सापळा रचून एमएच 29 सीबी 2690 क्रमांकाच्या ईको वाहनासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीतून किशोर रामराव वाटमोडे यांच्या गोडाऊनमध्ये तीन पोत्यांत भरलेली 150 पॅकेट्स बोगस कापूस बियाण्यांची माहिती समोर आली. त्यानंतर ज्ञानेश्वर किसन साखरकर यांच्या घरातून आणखी पाच पोत्यांमधून 250 पॅकेट्स हस्तगत करण्यात आले.

Girish Vyas : माजी विधान परिषद सदस्यांच्या बॅगेवर चोराट्यांचा डल्ला
पोलिसांचा सक्रिय सहभाग
कारवाईत उधम (50 पॅकेट), ग्लायफो गार्ड (50 पॅकेट) आणि तिलक (300 पॅकेट) या नावांनी बोगस कापूस बियाण्यांची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बियाणे अप्रमाणित असून शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात होता. 400 पॅकेट बोगस बियाण्यांची एकूण किंमत सुमारे 5 लाख 16 हजार 750 रुपये आहे. जप्त करण्यात आलेली दोन चारचाकी वाहने सुमारे 7 लाख रुपये किंमतीची आहेत. एकूण 12 लाख 16 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत झाला आहे. या प्रकरणी कृषी अधिकारी किशोर अंबरकर यांच्या तक्रारीवरून बाभुळगाव पोलिस ठाण्यात प्रविण वासुदेव साखरकर, रमेश सुखदेव लांजेवार आणि किशोर रामराव वाटमोडे या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडक कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, कृषी विकास अधिकारी लहुदास आडे, प्रविण जाधव (मोहीम अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सुरेश गावंडे (मंडळ कृषी अधिकारी बाभुळगाव), संजय पवार (कृषी अधिकारी प. स. यवतमाळ), सी. एस. हेडाऊ (विस्तार अधिकारी कृषी पंस बाभुळगाव) आणि स्थानिक पोलिसांचे पथक सहभागी झाले होते. या प्रकरणामुळे जिल्ह्यात अप्रतिष्ठित व अप्रमाणित बियाण्यांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. शेतकऱ्यांनी फक्त अधिकृत विक्रेत्यांकडून आणि प्रमाणित बियाण्यांचीच खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या बाजारपेठेत बोगस बियाण्यांच्या दलालांचे जाळे पसरत असून, शेतकऱ्यांच्या कष्टावर गदा येऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस व कृषी विभागाने केले आहे. अशी बियाणे वापरल्यास उत्पादनावर विपरित परिणाम होतोच, शिवाय आर्थिक फटका देखील बसतो.